लातूर : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनच्या दराने मोठी झेप घेतली असून दर प्रतिक्विंटल तब्बल ७,४०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.(Soybean Market)
मात्र या दरवाढीचा फायदा सामान्य शेतकऱ्यांना होत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. (Soybean Market)
कारण हंगामाच्या सुरुवातीलाच आर्थिक अडचणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला माल ५,००० रुपयांपेक्षाही कमी दराने विकून टाकला होता. त्यामुळे आता बाजार तेजीत असला तरी शेतकऱ्यांच्या गोदामात सोयाबीनचा एक दाणाही शिल्लक नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.(Soybean Market)
'शेतकऱ्यांकडे माल होता तेव्हा भाव नव्हता'
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, बाजारपेठेचे हे अजब चक्र दरवर्षीप्रमाणे यंदाही पाहायला मिळत आहे. जेव्हा शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात माल असतो, तेव्हा दर कोसळतात. मात्र शेतकऱ्यांचा माल संपल्यानंतरच बाजार तेजीत येतो.
हंगामाच्या प्रारंभी सोयाबीनचे दर ५,००० रुपयांच्या खाली होते. खरीप हंगामाचा खर्च, कर्जाचे हप्ते आणि घरखर्च भागवण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याच कमी दरात माल विकावा लागला. आता तोच दर ७,४०० रुपयांपर्यंत गेल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल जवळपास २,४०० रुपयाचा फटका बसल्याचे चित्र आहे.
पाच लाख हेक्टरवर लागवड; तरी शेतकरी रिकाम्या हाती
लातूर जिल्हा हा राज्यातील प्रमुख सोयाबीन पट्टा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात येते.
उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी साठवणुकीच्या सुविधांचा अभाव आणि तातडीच्या आर्थिक गरजा यामुळे शेतकरी काढणीनंतर लगेच विक्री करण्यास मजबूर होतात.
शेतकऱ्यांचा माल बाजारातून संपल्यानंतरच दर वाढतात, हा अनुभव यंदाही कायम राहिल्याचे दिसत आहे. त्यामुळे बाजारात तेजीची चर्चा सुरू असली तरी सामान्य शेतकरी मात्र रिकाम्या हाती असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आता फायदा कुणाला?
सध्या बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. हंगामाच्या काळात दररोज २० ते २२ हजार क्विंटल आवक होत होती. मात्र शुक्रवारी बाजार समितीत अवघी ४,८२४ क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली.
यावरून बाजारात मालाची कमतरता निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. आता फक्त मोठ्या शेतकऱ्यांकडे किंवा साठवणुकीची क्षमता असलेल्या व्यापारी आणि शेतकऱ्यांकडेच माल शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.
काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियाणे म्हणून राखून ठेवलेले सोयाबीनच आता वाढीव दरात विकले जात असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे 'हंगामाच्या सुरुवातीला अन्याय आणि आता दरवाढ कुणासाठी?' असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
बाजार समितीतील इतर शेतमालाची आवक
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी विविध शेतमालाची पुढीलप्रमाणे आवक झाली.
हरभरा – २,६५३ क्विंटल
तूर – २,०६८ क्विंटल
गहू – ६६२ क्विंटल
चिंच – ३८ क्विंटल
चिंचुका – २९१ क्विंटल
ज्वारी हायब्रीड – १८६ क्विंटल
मोठी ज्वारी – १४२ क्विंटल
गूळ – १२४ क्विंटल
करडई – ७४ क्विंटल
धने – २४ क्विंटल
मका – २० क्विंटल
उडीद – १४ क्विंटल
धण्याला सर्वाधिक दर
बाजार समितीत धणे या शेतमालाला सर्वाधिक दर मिळाला. धण्याचा सर्वसाधारण दर प्रतिक्विंटल ११ हजार रुपये इतका नोंदवण्यात आला. मात्र धण्याची आवक अत्यंत कमी म्हणजे अवघी २४ क्विंटल होती.
शेतकऱ्यांच्या घामाला योग्य भाव कधी?
सध्या बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी असली तरी त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही.
उत्पादनाच्या काळात योग्य हमीभाव, साठवणूक सुविधा आणि आर्थिक मदत उपलब्ध झाली नाही तर दरवाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होतो, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना साठवणूक आणि बाजार व्यवस्थापनाबाबत अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : १३ दिवसांत बाजार बदलला; बिजवाई सोयाबीन दराने गाठला उच्चांक
अधिक वाचा : Kanda Market : 'या' बाजारात कांद्याला उच्चांकी दर; अनेक बाजारात मात्र घसरण वाचा सविस्तर
Web Summary : Despite soaring soybean prices in Latur, most farmers already sold their stock at lower rates due to financial constraints. Only traders and larger farmers with storage capacity are benefiting from the price hike, leaving small farmers empty-handed.
Web Summary : लातूर में सोयाबीन की कीमतें बढ़ने के बावजूद, वित्तीय बाधाओं के कारण अधिकांश किसानों ने पहले ही कम दरों पर अपना स्टॉक बेच दिया। केवल व्यापारी और भंडारण क्षमता वाले बड़े किसान ही मूल्य वृद्धि से लाभान्वित हो रहे हैं, जिससे छोटे किसान खाली हाथ हैं।