छत्रपती संभाजीनगर : विपरीत हवामानामुळे यंदा केशर आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून सुमारे ७० टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि फळगळ यामुळे बागांना मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षी दिवाळीपर्यंत झालेल्या पावसाचा परिणाम यंदाच्या हंगामावरही झाला.
फळबागतज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांच्या मते, सुरुवातीला ४० टक्के उत्पादन अपेक्षित होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत केवळ ३० टक्केच उत्पादन हाती येईल. कोकणातील बागांनाही याचा फटका बसला आहे. दरम्यान, आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातही बाधित होण्याची शक्यता आहे.
केशर आंब्याची सर्वाधिक निर्यात आखाती देशांमध्ये होत असल्याने उत्पादन घट आणि निर्यात अडचणीमुळे बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. एकीकडे उत्पादन घटले आहे, तर दुसरीकडे आखाती देशात युद्ध सुरू आहे. देशभरातून सर्वाधिक आंब्याची निर्यात आखाती देशात होते. यानंतर अमेरिका, युरोपियन देशांतूनही आपल्या आंब्याला मागणी असते. मात्र, उत्पादन घटल्याने निर्यातही अत्यल्प होईल.
आपेडा चेअरमनसोबत ७एप्रिल रोजी बैठक
दरवर्षीप्रमाणे आंबा निर्यातीच्या पार्श्वभूमीवर अॅग्रिकल्चर प्रोसेस फूड डेव्हलपमेंट एक्स्पोर्ट अॅथॉरिटी (आपेडा) च्या संचालकांनी ७ मार्च रोजी नवी दिल्ली येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे संचालक डॉ. दामोधरण आणि निर्यातदार यांना बोलावले आहे. या बैठकीत आंबा निर्यातीबाबत निर्णय होणार असल्याचे डॉ. कापसे यांनी सांगितले.
