अनिल भंडारी
गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला अपेक्षित दर न मिळाल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते.(Rajma Market)
बाजारात सोयाबीनला सातत्याने ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल इतकाच भाव मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून राजमा लागवडीकडे मोर्चा वळवला.(Rajma Market)
याचा सकारात्मक परिणाम आता बाजारात दिसून येत असून राजमाला ६ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे.(Rajma Market)
कमी कालावधीचे पीक, अधिक फायदा
सोयाबीनचे पीक येण्यासाठी सुमारे ११० दिवसांचा कालावधी लागतो, तर राजमा हे केवळ ७५ दिवसांत येणारे पीक आहे.
कमी कालावधीत तयार होणारे आणि सध्या चांगला बाजारभाव देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांचा राजमाकडे कल वाढला आहे.
यंदा थंडीमुळे राजमाचे पीक अधिक बहरले असून उत्पादनही समाधानकारक असल्याचे शेतकरी सांगतात.
बाजारात नव्या पिकाची आवक सुरू
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरलेल्या राजमाचे नवे पीक आता बाजारात दाखल होऊ लागले आहे. पुढील काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे.
अनेक व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राजमाची खरेदी करत असल्याचे चित्र आहे.
बीड बाजार समितीतील दरस्थिती
१६ जानेवारी रोजी बीड बाजार समितीत एकूण १७४ क्विंटल शेतमालाची आवक झाली, यामध्ये ३ क्विंटल राजमाची आवक होती. त्या दिवशी राजमाला ६ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
१७ जानेवारी रोजी एकूण २४२ क्विंटल शेतमालाची आवक झाली, त्यामध्ये साडेनऊ क्विंटल राजमाची आवक होती. या दिवशी राजमाला ५ हजार ९०० ते ७ हजार १ रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी ६ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्याच काळात सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये इतकाच भाव मिळत होता.
मात्र, गेल्या चार दिवसांत अंशतः तेजी येऊन काही ठिकाणी सोयाबीनला ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात १७ हजार हेक्टरमध्ये राजमाचा पेरा
कृषी विभागाच्या माहितीनुसार, गतवर्षी बीड जिल्ह्यात सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर राजमाचा पेरा होता.
यंदा त्यामध्ये ४ हजार हेक्टरची वाढ होऊन एकूण १७ हजार हेक्टर क्षेत्रात राजमाचे पीक घेण्यात आले आहे.
बीड, केज, अंबाजोगाई आणि माजलगाव तालुक्यांत राजमाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पुढील वर्षी क्षेत्र वाढण्याचा अंदाज
सोयाबीनच्या कमी दरांमुळे मेटाकुटीस आलेले शेतकरी राजमाकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदाही राजमाला समाधानकारक आणि स्थिर भाव मिळाल्यास पुढील वर्षी जिल्ह्यात राजमाचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांसाठी राजमा हे आता फायदेशीर आणि विश्वासार्ह पर्यायी पीक ठरत असल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा सविस्तर : Rajma Cultivation : जमिनीचा पोत सुधारतोय; राजमाने दिला शेतकऱ्यांना नवा आधार
