जळगाव : यंदाच्या आंब्यांच्या बाजारात केरळी 'गुलाब कश'ने एन्ट्री घेतली आहे. अस्मानी संकटामुळे यंदा गुजरात 'केसर' उशिरा दाखल होणार आहे. त्यामुळे मार्चमध्ये होळीपर्यंत तरी 'गुलाब कश'चा तोरा कायम राहणार आहे.
अवकाळी पावसाने मोहोर गळून पडला. त्यामुळे गुजरातच्या कैरी बाजाराची घडी विस्कटली. दररोज गुलाब कशच्या २० पेट्या जळगावात दाखल होत असताना या आंब्याला २५० ते ३५० रुपयांचा दर मिळत आहे. गुजरातच्या 'केसर'सह विजयवाड्यातील 'बदाम' बाजारात दाखल होत नाही तोपर्यंत आंब्याचे दर तेजीतच राहणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
'कैरी' महागाईने आंबट
तोतापुरीसह अन्य कैरी बाजारात उपलब्ध आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कैरी बाजारात दाखल झाली. सुरुवातीला १०० ते १५० रुपयांचा भाव होता. आता मात्र कैरीने २०० रुपयांचा भाव घेतला आहे. त्यामुळे महागाईने आंबटलेल्या कैरीचे मोजकेच ग्राहक बाजारात दिसून आले.
'हापूस'ला पाठ
कोकणातला 'हापूस' गेल्या आठवड्यात मुंबईत दाखल झाला आहे. २००० ते २२०० रुपये डझन भाव असल्यामुळे जळगावच्या ग्राहकांकडून प्रतिसाद मिळणार नाही, त्यामुळे कोणत्याची व्यापाऱ्याने हापूस खरेदीत पैसा गुंतविण्याचे धाडस केलेले नाही. त्यामुळे मार्चच्या मध्यान्हापर्यंत 'हापूस'चे जळगावकरांना दर्शन होणार नाही.
'बैंगन फल्ली' पण नकोसा
जळगावच्या बाजरात 'बैंगन फल्ली'ची तुरळक प्रमाणात आवक आहे, या आंब्याचा गोडवा कमी प्रमाणात असल्याने स्वस्त असतानाही ग्राहकांनी त्याला पाठ दाखवली आहे. हा आंबा २०० ते २५० रुपये किलोने विक्री होत आहे.
