Mosambi Market : कधी अतिवृष्टी, तर कधी बाजारातील भावपाडी… निसर्ग आणि व्यापारी या दोघांमध्ये अडकून शेतकरी मात्र चारीबाजूंनी हरत चालला आहे. खरीप हंगामात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. (Mosambi Market)
चिखलात पिके विस्कटली, अनेक ठिकाणी शेतांचे तुकडे पुराच्या पाण्याने वाहून गेले. जे थोडेफार पीक हातात आले, त्यालाही व्यापाऱ्यांनी कवडीमोल भाव लावून पुन्हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले.(Mosambi Market)
मोसंबीला अवघे ५ रुपये किलो!
लाडसावंगी, बदनापूर आणि जालना हा परिसर 'मोसंबी हब' म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदा या फळबागांवर निसर्गाची वक्रदृष्टी दिसते. मोसंबीला बाजारात अवघे ५ रुपये किलो दर मिळत आहेत.
त्यात भर म्हणजे मांगूर (काळे डाग) रोगाचा फैलाव वाढला आहे. लाल कोळी आणि डासांमुळे फळांची गुणवत्ता खराब झाली असून बाजारातील मागणी कमी झाली आहे.
झाडांना पाण्याचा ताण येऊ देऊ नये. आठवड्यातून एकदा पाणी आणि पंधरा दिवसांतून दोनदा डायकोफॉल (२७ ml/१० L) फवारणी करणे गरजेचे आहे.- सुधाकर पाटील, कृषी सहाय्यक
मका आणि कापूसही भावपाडीत
शेतकऱ्यांची परिस्थिती केवळ फळपिकातच बिकट नाही, तर खरीप पिकांनाही व्यापाऱ्यांनी पाडलेले भाव मिळत आहेत.
मका : १,०००–१,२०० रुपये / क्विंटल
कापूस : ५,०००–६,००० रुपये / क्विंटल
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात शासनाची कापूस खरेदी अद्याप सुरू नसल्याने व्यापारी मनमानी दर देत आहेत. शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने नुकसान सोसून कापूस विकावा लागत आहे.
१० क्विंटल मका… आणि शेवटी फक्त १० हजार उत्पन्न
दरवर्षी ३० ते ३५ क्विंटल उत्पन्न मिळते. पण अतिवृष्टीमुळे यंदा फक्त १० क्विंटल मका निघाला. २० हजार रुपये खर्च झाला, आणि उत्पन्न फक्त १० हजार मिळाले. शेवटी १० हजारांचे तोट्यात गेलो.- संदीप शिंदे (शेतकरी, लाडसावंगी)
शेतकरी पुन्हा अडचणीत
शासनाकडून जाहीर केलेली मदत हातात येतेय खरी, पण ती रब्बी पेरणीसाठीही अपुरी ठरत आहे. त्यामुळे शेतकरी थोडाफार माल विकूनच पुढील हंगामाची पेरणी करत आहेत. तोट्याच्या चक्रातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसल्याने शेतीमालकांमध्ये तीव्र नैराश्य आहे.
निसर्गाच्या कोपाने पोखरलेली शेती आणि बाजारातील व्यापाऱ्यांच्या मनमानीने पाडलेले भाव… या दोन्हींचा मार सहन करत हरतो तो फक्त शेतकरीच.
हे ही वाचा सविस्तर : Sugarcane Workers Story : थंडीतही हातात कोयता… ऊस कामगारांचे आयुष्य संघर्षमयच
