नाशिक : सलग सहा महिने सुरू राहिलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका बसला असून, त्याचा थेट परिणाम द्राक्ष निर्यातीवर झाला आहे. यंदा द्राक्ष उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांहून अधिक घट झाल्याने जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात संथ गतीने सुरू आहे. निर्यातीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे.
युरोपमधील नेदरलँड, जर्मनी देशांकडे आतापर्यंत केवळ ३१३ कंटेनरमधून सुमारे ४,२०२ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली आहे. सन २०२४-२५ हंगामात देशातून २ लाख ७१ हजार २५३ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून सुमारे ३ हजार ५० कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला प्राप्त झाले होते. मात्र, यंदाचा हंगाम द्राक्ष उत्पादकांसाठी आव्हानात्मक ठरला आहे.
यंदा महाराष्ट्रातून ३० हजार ४६० द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली असून, कर्नाटकातून केवळ ९ द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात आली आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षांना मोठी मागणी असतानाही प्रत्यक्ष निर्यात कमी राहणे ही चिंतेची बाब आहे.
वाढता वाहतूक खर्च, हवामानातील सातत्याने होणारे बदल, उत्पादन खर्च, मजूर टंचाई या अडचणींवर मात करत द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची परंपरा कायम ठेवली आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष निर्यातीसाठी केंद्र सरकारने विशेष सवलत देण्याची मागणी शेतकरी व निर्यातदारांकडून होत आहे.
यंदा सहा महिने सतत पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. उत्पादन जवळपास निम्म्यावर आले आहे. खर्च मात्र तसाच वाढलेला आहे. शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
- सुनील गवळी, द्राक्ष उत्पादक, ब्राह्मणगाव-विंचूर
Read More : तुमच्या गावातून कुणाकुणाला पीएम किसानचे 2 हजार रुपये मिळतात, पहा एका क्लिकवर
