Karanja Market : सोयाबीनला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाल्याच्या निषेधार्थ कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले. (Karanja Market)
व्यापाऱ्यांनी बोली कमी ठेवताच संतप्त शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आणि हर्रासी थांबवली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला. (Karanja Market)
कमी दरावरून शेतकऱ्यांचा संताप
सोमवारी (१० नोव्हेंबर) विक्रमी आवक झाल्यामुळे मंगळवारी बाजार समितीने नवीन आवक बंद ठेवून आतल्या मालाचा निपटारा करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, ११ नोव्हेंबरला हर्रासी सुरू होताच काही व्यापाऱ्यांनी दर कमी ठेवले. यामुळे शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला आणि १० नोव्हेंबरचेच दर लागू करावेत, अशी मागणी केली. व्यापाऱ्यांनी नकार दिल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले.
पोलिस बंदोबस्तात हर्रासी स्थगित
सचिव नीलेश भाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण संतप्त शेतकरी आपली भूमिका कायम ठेवत होते. परिस्थिती गंभीर होताच ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला. अखेरीस शेतकऱ्यांच्या मागणीला मान देत सचिवांनी हर्रासी १२ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली.
सोयाबीन विक्रीसाठी वर्धा, नांदेडचे शेतकरी कारंजात
अलीकडे कारंजा बाजार समितीत सोयाबीनला ७ हजार ५०० ते ९ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याच्या पावत्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.
त्यामुळे वर्धा, माहूर, नांदेडसह दूरवरच्या गावांतील शेतकरी सोयाबीन घेऊन कारंज्यात आले. मात्र प्रत्यक्षात केवळ ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतकाच भाव मिळाल्याने ते निराश आणि संतप्त झाले.
या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमोल लूलेकर यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी ठाम मागणी केली. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय मनसे सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. बाजार समितीत दर कमी करून व्यापारी आमची फसवणूक करत आहेत. आमच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळायला हवा.
कारंजा बाजार समितीत झालेल्या गोंधळामुळे शेतकऱ्यांचा रोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. व्यापाऱ्यांच्या कमी बोलीदराविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
