नाशिक : मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) येथे कंटेनर आत सोडण्याची प्रक्रिया संथगतीने सुरु आहे. परिणामी या ठिकाणी कंटेनरच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या वाढत्या ट्रॅफिकवर निर्यातदारांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
जीटीआय (गेटवे टर्मिनल इंडिया), बीएमसीटी (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) आणि विविध टोल प्लाझा प्रवेश बिंदूंवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने ही बाब समोर आली आहे. रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने आणि अनेक बंदर दरवाजे अर्धवट सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर आले आहे.
निर्यातदारांच्या मते, जिथे सर्व कंटेनरना कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, तिथे म्हणजेच पार्किंग प्लाझा येथे ट्रक लांब रांगेत अडकले आहेत. कारण ही सर्व प्रक्रिया संथगतीने सुरु आहे. परिणामी वाहतूक खोळंबली आहे. यामध्ये नाशवंत माल म्हणजेच कांदा, द्राक्ष पिकांसह इतर पिके वाहून नेणाऱ्या रेफर कंटेनरना सर्वात जास्त त्रास होतो.
तसेच प्लाझा साफ करण्यासाठी २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो आणि टर्मिनल गेटपर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त १२-२४ तास लागतात. "या वाढत्या विलंबामुळे नाशवंत मालाची ४८ तासांची अंतिम मुदत ओलांडली जाते, ज्यामुळे वारंवार बंद पडते, आर्थिक नुकसान होते आणि शिपमेंट वेळापत्रक चुकते," असे एका निर्यातदाराने सांगितले.
निर्यातदार संघटनेकडून निवेदन
दरम्यान हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्टर्स असोसिएशन (HPEA) च्या शिष्टमंडळाने कस्टम आयुक्तांना निवेदन देण्यात आले. आयुक्तांनी सांगितले की, यावर लवकरच तोडगा काढला जाईल. वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि सर्व बंदर प्रवेशद्वारांवरून कंटेनरची हालचाल जलद करण्यासाठी पावले उचलली जातील.
वारंवार होणारी वाहतूक कोंडी ही एक गंभीर आव्हान बनली आहे. त्यांनी भारताच्या प्रमुख निर्यात प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या जेएनपीटीवरील सुरळीत कामकाज देशाच्या निर्यातीला गती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. अशा प्रकारचे अडथळे टाळण्यासाठी रीफर कार्गोसाठी एक समर्पित जलदगती मार्ग तयार करण्याची विनंती केली आहे.
-विकास सिंह, उपाध्यक्ष, एचपीईए
