जळगाव : रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीची अंतिम मुदत आता ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या विनंतीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
दुसरीकडे तहसीलदारांकडून गोदाम उपलब्ध होत नसल्याने ज्वारी पडून असते, ही अडचण पाहता जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गोदाम उपलब्ध करून देण्याची पत्राद्वारे विनंती केली आहे.
राज्यात यंदा ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, खुल्या बाजारात ज्वारीला किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे खरेदीची मुदत एक महिन्याने वाढवण्याची विनंती केली होती. केंद्र सरकारने १८ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या पत्राद्वारे मुदतवाढ दिली आहे.
त्यामुळे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आता ३० सप्टेंबरपर्यत शेतकऱ्यांकडून ज्वारीची खरेदी करू शकतील. ही खरेदी १४ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व अटी आणि शर्तीनुसारच करण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार असल्याचे रोहित निकम यांनी कळविले.