नंदुरबार : युद्धजन्य परिस्थितीमुळे यंदा हळदीच्या निर्यातीवर परिणाम झाला. यंदा राज्यात सरासरी उत्पादन २५ टक्के अधिक झाले आहे. ओल्या हळदीला सरासरी क्विंटलला २४०० ते २८०० रुपये भाव होता. युद्ध सुरू झाल्यापासून हे भाव घसरले आहेत.
सध्या सरासरी २००० ते २४०० रुपये भाव मिळत आहे. कोरड्या हळदीचे भाव मात्र स्थिर आहे. सरासरी क्विंटलला १६ हजार ते २३ हजार रुपये भाव मिळत आहे. युद्ध लांबल्यास ओल्या हळदीचे भाव आणखी घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जागतिक बाजारपेठेत भारतीय हळदीला मोठी मागणी असतांना, यंदा हळद उत्पादन सरासरी २५ टक्के जादा होऊनही युद्धामुळे ओल्या हळदीचे भाव क्विंटलला ५०० ते ७०० रुपयांनी घसरले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात यंदा जवळपास सव्वाशे ते दीडशे एकरवर हळदीची लागवड झाली होती. खरेदीदार व्यापारी कमी आणि भाव कमीमुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
दर्जेदार बेण्यांसाठी प्रयत्न
याबाबत तन्हाडी, ता. शहादा येथील हळद उत्पादक शेतकरी पुष्पलाल चौधरी यांनी सांगितले, यंदा शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल वाढत आहे. कमी भांडवल, शासनाचे अनुदान आणि हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून हळदकडे पाहिले जाऊ लागले आहे. युद्धाची परिस्थिती निवळल्यावर हळदीचा भाव पूर्ववत होऊ शकतो.
हळद शेतीसाठी जमीन
हळदीसाठी मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी आणि भुसभुशीत जमीन योग्य असते. चुनखडीयुक्त जमिनीत लागवड टाळावी, कारण तिथे पिकाची वाढ नीट होत नसल्याचे कृषी विभागाने सांगितले. कृषी विभागाने शेतकऱ्यांनाच हळद शिजवणे, वाळवणे व पॉलिसिंगसाठी अनुदान उपलब्ध करून दिले तर व्यापाऱ्यांच्या मोनोपॉलीवर मात करता येऊ शकणार आहे.
अनेक शेतकरी शेतातून ओली हळद काढून ती थेट विक्री करीत असतात. त्यामुळे भावाबाबत शेतकऱ्यांची निराशा होत असते. मसाला पीक असल्याने व जगात भारत हा मुख्य निर्यातदार देश असल्याने दबदबा कायम राहावा यासाठी शासन शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहन देते.
शरबती गव्हाला क्विंटलमागे काय दर मिळतोय, वाचा जिल्हानिहाय आजचे गहू बाजारभाव
