हिंगोली : मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येथील मोंढा आणि हळद मार्केट यार्डातील शेतमाल लिलाव २६ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहेत.
या दहा दिवसांच्या सुटीमुळे मुख्य बाजारपेठेतील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून, आर्थिक गरजेमुळे शेतकऱ्यांना आपला माल खुल्या बाजारात कमी दरात विक्री करावा लागत आहे.(Hingoli Halad Market Yard)
खुल्या बाजाराचा पर्याय, पण भाव कमी
सध्या शेतकऱ्यांकडे तूर, सोयाबीन, गहू, ज्वारी तसेच हळदीचा माल विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, बाजार समितीचा मोंढा आणि हळद मार्केट यार्ड बंद असल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजाराचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. येथे व्यापाऱ्यांकडून अपेक्षित भाव मिळत नसून, पडत्या दरात खरेदी होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.
व्यापाऱ्यांची मनमानी वाढली
बाजार समिती बंद असल्यामुळे खुल्या बाजारात काही व्यापारी मनमानी पद्धतीने भाव ठरवत असल्याचे चित्र आहे.
सोयाबीन, तूर, हरभरा आणि हळद यांसारख्या पिकांची खरेदी कमी दरात केली जात असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे अधिकृत परवाना आहे की नाही, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हळद उत्पादकांना मोठा फटका
हिंगोलीचे हळद मार्केट यार्ड हे मराठवाडा आणि विदर्भात प्रसिद्ध असून, हंगामात येथे दररोज ४ ते ५ हजार क्विंटल हळदीची आवक होते. सध्या हळद हंगामाची सुरुवात असतानाच बाजार बंद राहिल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांची मागणी
बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतमालाचे लिलाव तातडीने सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
अन्यथा, खुल्या बाजारातील कमी दरामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आर्थिक निकड वाढली
शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी, कर्जफेडीसाठी आणि घरगुती गरजांसाठी तातडीने पैशांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत बाजार बंद असल्याने त्यांना पर्याय नसून, कमी दरातही माल विकावा लागत आहे.
मोंढा बंदमुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले असून, खुल्या बाजारातील पडते दर आणि व्यापाऱ्यांची मनमानी यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे. लिलाव प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
