Harbhara Market : यंदाच्या २०२५-२६ हंगामात हरभऱ्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Harbhara Market)
'स्मार्ट'च्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्षाच्या अहवालानुसार, देशातील हरभऱ्याचे उत्पादन सुमारे ११७.९ लाख टनांपर्यंत पोहोचू शकते. (Harbhara Market)
तर महाराष्ट्रातही उत्पादन सुमारे ३०.५ लाख टनांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Harbhara Market)
अनुकूल हवामानामुळे उत्पादनात वाढ
हरभरा हे प्रमुख रब्बी पीक असून त्याची पेरणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केली जाते, तर काढणी मार्च-एप्रिलमध्ये सुरू होते.
सध्या राज्यभरात काढणीचा हंगाम सुरू असून यंदा वेळेवर झालेला पाऊस, अनुकूल हवामान आणि सुधारित कृषी व्यवस्थापन यामुळे उत्पादनात वाढ झाल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
वाढती आवक, दरांवर दबाव
उत्पादन वाढल्यामुळे बाजारात हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त झाल्याने दरांवर दबाव निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
बाजार माहिती विश्लेषण कक्षाच्या अहवालानुसार सध्या हरभऱ्याच्या किमतींमध्ये स्थिरता किंवा घट दिसून येत आहे.
एप्रिलमध्ये मर्यादित दरवाढीची शक्यता
एप्रिल २०२६ दरम्यान हरभऱ्याच्या किमतीत थोडीफार वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या कालावधीत बाजारभाव सुमारे ४,९०० ते ५,३०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहू शकतात, असे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
उत्पादन वाढीमुळे एकीकडे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असली तरी दरांवरील दबाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी घाईघाईने विक्री न करता योग्य वेळ साधून विक्रीचे नियोजन करणे आवश्यक आहे.
साठवणूक क्षमता, बाजारातील ट्रेंड आणि भावातील चढ-उतार यांचा अभ्यास करून निर्णय घेतल्यास चांगला दर मिळू शकतो, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
हरभऱ्याचे उत्पादन विक्रमी होण्याच्या मार्गावर असले तरी बाजारातील वाढती आवक आणि कमी दर यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे उत्पादनासोबतच बाजार नियोजनही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे.
अधिक वाचा : Hingoli Halad Market Yard : हळद मार्केट यार्ड बंद; आता काय करणार शेतकरी?
