अमरावती/उमरेड
हमीभावाने हरभरा खरेदीसाठी अंतिम तारीख २९ एप्रिल निश्चित असताना, केंद्र शासनाचे पोर्टल २४ एप्रिललाच अचानक बंद करण्यात आल्याने अमरावती जिल्ह्यातील पाच ते सहा हजारांहून अधिक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.(Harbhara Kharedi)
नोंदणी करूनही खरेदी प्रलंबित राहिल्याने शेतकऱ्यांना खासगी बाजारात कमी दरात हरभरा विकण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे.(Harbhara Kharedi)
पाच दिवस आधीच पोर्टल बंद
नाफेडमार्फत हरभरा खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू असतानाच २४ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पोर्टल अचानक बंद करण्यात आले.
खरेदीची अधिकृत मुदत २९ एप्रिलपर्यंत असताना ही कारवाई झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
अनेक शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस (SMS) मिळाल्यानंतर ते माल घेऊन केंद्रांवर पोहोचले होते. मात्र, पोर्टल बंद झाल्याने त्यांची खरेदी होऊ शकली नाही.
हजारो शेतकऱ्यांची खरेदी प्रलंबित
जिल्ह्यातील स्थिती गंभीर असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते
नोंदणी अर्ज: ६६९२
शेड्युलिंग झालेले: २५६८
शेड्युलिंग बाकी: ४१२४
खरेदी झालेले शेतकरी: २६९८
एकूण खरेदी: ७१,७११ क्विंटल
खरेदी मूल्य: ४२.१३ कोटी रुपये
या पार्श्वभूमीवर हजारो शेतकऱ्यांचा माल अजूनही खरेदीविना पडून आहे.
केंद्रांवर ट्रॅक्टरच्या रांगा, खर्चाचा भुर्दंड
खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी मालासह ट्रॅक्टर आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लावल्या होत्या. उन्हात तासन्तास थांबूनही खरेदी न झाल्याने त्यांना वाहन भाडे आणि इतर खर्चाचा दुहेरी आर्थिक फटका बसला आहे. 'उद्दिष्ट पूर्ण' कारण देत खरेदी बंद
राज्यासाठी केंद्र सरकारने ७.६१ लाख मेट्रिक टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत पोर्टल बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांची खरेदी बाकी असतानाही हा निर्णय घेण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुदतवाढ आणि पोर्टल सुरू करण्याची मागणी
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे संचालक नितीन हिवसे यांनी पणन विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र देत पोर्टल पुन्हा सुरू करण्याची व मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. तसेच, खासदार अनिल बोंडे यांनीही राज्य व केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला आहे.
उमरेडमध्येही तशीच स्थिती
उमरेडमध्येही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत ३५८ नोंदणी; २८१ शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण
खरेदी-विक्री समितीत ३४६ नोंदणी; ८,३३२ क्विंटल खरेदी
मात्र, संगणकीय प्रणाली अचानक बंद झाल्याने उर्वरित शेतकऱ्यांची खरेदी थांबली आहे.
'नाफेडने अन्याय केला';शेतकऱ्यांचा आरोप
खरेदीची मुदत संपलेली नसताना 'लिमिट संपली' असा संदेश देत खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांनी नाफेडवर तीव्र टीका केली आहे.
मुदत २९ एप्रिलपर्यंत असताना खरेदी आधीच बंद करणे चुकीचे आहे. नाफेडने खरेदी तात्काळ सुरू करावी. -रूपचंद कडू, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरेड
नोंदणीनंतरही खरेदीला उशीर
शेतकऱ्यांना नोंदणी केल्यानंतर खरेदीसाठी साधारण २ ते ३ आठवडे प्रतीक्षा करावी लागते. या विलंबामुळे अनेकांची खरेदी आधीच प्रलंबित होती. त्यातच पोर्टल बंद झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
हरभरा खरेदीची मुदत संपण्याआधीच पोर्टल बंद केल्याने हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांचा माल खरेदी न झाल्यास त्यांना खासगी बाजारात कमी दरात विक्री करावी लागेल, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पोर्टल तातडीने सुरू करून खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
हे ही वाचा सविस्तर :harbhara kharedi : मुदतीपूर्वीच हरभरा खरेदी बंद; काय आहे कारण वाचा सविस्तर
अधिक वाचा :Super El Nino Alert : भारतावर 'हीट डोम' तयार झालाय; याचा नेमका अर्थ काय?
Web Summary : Chickpea procurement stopped abruptly before the deadline, leaving thousands of farmers in Amravati and Umred distressed. The portal closure, citing achieved targets, jeopardizes farmers' income, forcing them to sell at lower prices. Urgent appeals seek extension and portal reopening.
Web Summary : चना खरीद समय सीमा से पहले अचानक रुकी, जिससे अमरावती और उमरेड में हजारों किसान परेशान हैं। लक्ष्य पूरा होने का हवाला देते हुए पोर्टल बंद होने से किसानों की आय खतरे में है, जिससे उन्हें कम कीमत पर बेचने के लिए मजबूर होना पड़ रहा है। तत्काल विस्तार और पोर्टल को फिर से खोलने की अपील की गई है।