Harbhara Kharedi : नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील विविध शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर बारदाण्याच्या तीव्र टंचाईमुळे हरभरा खरेदी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे.(Harbhara Kharedi)
त्यामुळे दूरवरून माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, केंद्रांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.(Harbhara Kharedi)
खरेदी प्रक्रिया ठप्प, शेतकरी ताटकळत
नायगाव तालुक्यातील मोकासदरा येथील खरेदी केंद्रावर २३ मार्चपासून हरभरा खरेदी बंद आहे. बारदाणा (पोते) उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे वजनही होत नसून, शेतकऱ्यांना वाहनांसह दिवसरात्र केंद्रावर थांबावे लागत आहे. परिणामी, त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.(Harbhara Kharedi)
'नाफेड' केंद्रही बंद
बोरी येथील 'नाफेड'च्या हरभरा खरेदी केंद्राचीही हीच अवस्था आहे. तुळजाभवानी सहकारी संस्थेमार्फत चालविण्यात येणारे हे केंद्र गेल्या १० दिवसांपासून बारदाण्याअभावी बंद आहे.
या केंद्रावर आतापर्यंत सुमारे ३५० शेतकऱ्यांनी हरभरा विक्री केली होती; मात्र सध्या बारदाण्याच्या तुटवड्यामुळे व्यवहार ठप्प झाले आहेत.
वाहनांच्या रांगा, शेतकऱ्यांचा मुक्काम
खरेदी बंद असल्यामुळे अनेक शेतकरी आपला हरभरा घेऊन केंद्रावरच थांबले आहेत. वाहनांच्या रांगा लागल्या असून, काहींना केंद्रावरच मुक्काम करावा लागत आहे. यामुळे वाहनभाडे, मजुरी आणि इतर खर्च वाढत असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
प्रशासनाकडे मागणी
बारदाण्याअभावी निर्माण झालेल्या या परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन खरेदी केंद्रांवर आवश्यक त्या प्रमाणात बारदाणा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. अनिल पिंपळदरे, शिवाजी वंचेवाड, राजेश्वर गोरडवार, मन्मथ विभूते, अशोकराव गंदेवार यांसह अनेक शेतकऱ्यांनी याबाबत आवाज उठवला आहे.
अधिकाऱ्यांचे आश्वासन
केंद्र संचालक विठ्ठल शिंदे यांनी सांगितले की, बारदाण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. तर जिल्हा मार्केटिंग अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी पणन महासंघाकडे पाठपुरावा सुरू असून, लवकरच बारदाणा उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
शेतकऱ्यांवर आर्थिक ताण
हरभरा विक्रीसाठी आधीच प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत आहे. वाहनांचे भाडे, मजुरी आणि वेळेचा अपव्यय यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे.
बारदाण्याच्या टंचाईमुळे हरभरा खरेदी पूर्णपणे ठप्प झाली असून, शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा सविस्तर : Harbhara Kharedi : हरभरा खरेदी अडकली; काय आहे कारण? वाचा सविस्तर
अधिक वाचा : Umed Scheme : माऊलीच्या कष्टाला लेकरांची स्मार्ट साथ; 'उमेद'ने घडवली बिझनेस क्रांती!
