Harbhara Bajarbhav : रब्बी हंगामातील हरभराबाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल होण्यापूर्वीच दरात घसरण सुरू झाल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.(Harbhara Bajarbhav)
मागील आठवड्यात प्रतिक्विंटल ५ हजार ५०० रुपयांवर व्यवहार होणारा हरभरा सध्या सुमारे ५ हजार २०० रुपयांपर्यंत खाली आला असून, प्रतिक्विंटल तब्बल ३०० रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.(Harbhara Bajarbhav)
उत्पादन चांगले; पण दरात अस्थिरता
यंदा नियोजनबद्ध लागवड, वेळेवर पेरणी आणि योग्य देखभाल यामुळे हरभऱ्याचे उत्पादन समाधानकारक येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
खरीप हंगामातील नुकसानाची भरपाई रब्बीतून होईल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर विशेष भर दिला होता.
मात्र, नवीन माल बाजारात दाखल होण्यापूर्वीच दर घसरल्याने आर्थिक गणित बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.
मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्यानंतर मागणी-पुरवठ्याच्या तत्त्वानुसार दरावर आणखी दबाव येऊ शकतो, असे व्यापारी सांगत आहेत.
वाढलेला खर्च; नफा अनिश्चित
बियाणे, रासायनिक खते, कीडनाशके, मजुरी आणि सिंचन खर्चात लक्षणीय वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत सध्याचा ५ हजार २०० रुपयांचा दर समाधानकारक नसल्याचे शेतकरी सांगतात.
किमान उत्पादन खर्च तरी भरून निघावा आणि काही प्रमाणात नफा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यंदा हरभऱ्याचे पीक चांगले आले आहे. खरीप हंगामात नुकसान झाल्याने रब्बीवरच आमचा भर होता. मात्र बाजारात माल येण्यापूर्वीच दर कमी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकरी संतोष कराळे यांनी दिली.
आधारभूत दराच्या पातळीवर व्यवहाराची मागणी
उत्पादन चांगले असूनही योग्य बाजारभाव न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती आहे.
किमान आधारभूत दराच्या (MSP) पातळीवर व्यवहार व्हावेत आणि बाजारात दरांना स्थैर्य मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सध्या बाजारात आवक मर्यादित आहे; मात्र पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर हरभरा दाखल होण्याची शक्यता आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्यास दरावर दबाव येतो. आवक आणि मागणी यामध्ये संतुलन राहिल्यास दर स्थिर राहू शकतात.- नवल केला, व्यापारी
हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक
बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. गहू, मका, रब्बी ज्वारी आणि कांदा या पिकांच्या तुलनेत हरभऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने दरातील चढ-उताराचा परिणाम मोठ्या संख्येतील शेतकऱ्यांवर होत आहे.
नवीन हरभरा बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल होण्यापूर्वीच दर घसरल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बाजारातील मागणी-पुरवठ्याचे संतुलन राखले गेले आणि दरांना स्थैर्य मिळाले, तरच रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळू शकेल.
