नाशिक :द्राक्ष हंगाम (Grape Season) सुरु झाला असून हळूहळू बाजारात द्राक्षांची आवक येऊ लागली आहे. द्राक्ष पंढरी समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातुन निर्यातक्षम द्राक्षांची (Grape Export) निर्यात होऊ लागली आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी द्राक्षमणी खरेदी विक्री केंद्रही सुरु करण्यात आले आहे. यावेळी खानगांव नजिक येथे द्राक्षमणी 21 रुपये प्रति किलो या दराने विक्री झाला. तसेच उगांव येथे मुहूर्तावर लहु कडाळे यांचा द्राक्षमणी 61 रुपये प्रति किलो या दराने विक्री झाला.
निफाड तालुक्यात द्राक्ष काढणी हंगाम (Grape Harvesting) सुरू झाला असुन द्राक्षांच्या पॅकींगनंतर उरणाऱ्या द्राक्ष मण्यांना योग्य बाजारभाव (Draksh Market Yard) मिळण्यासाठी शेतकरी बांधवांना हे सोयीस्कर ठरणार आहे. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते द्राक्षमणी कॅरेटचे विधीवत पुजन करण्यात आले. खानगांव नजिक येथे मुहूर्तावर आकाश भोसले यांचा द्राक्षमणी 21 रुपये प्रति किलो या दराने विक्री झाला. सायंकाळपर्यंत 228 द्राक्षमणी कॅरेटची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी 04 रुपये, जास्तीत जास्त 25 रुपये, तर सरासरी 19 रुपये प्रति किलो याप्रमाणे होते.
तसेच उगांव येथे मुहूर्तावर लहु कडाळे यांचा द्राक्षमणी 61 रुपये प्रति किलो या दराने विक्री झाला. सायंकाळपर्यंत 160 द्राक्षमणी कॅरेटची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी 07 रुपये, जास्तीत जास्त 61 रुपये, तर सरासरी 21 रुपये प्रति किलो याप्रमाणे होते. या मार्केटमुळे खानगाव नजिक व उगावसह परिसरातील नांदगाव, डोंगरगाव, रूई, धानोरे, कोळगाव, खेडलेझुंगे, धारणगाव वीर, धारणगाव खडक, नांदुरमध्यमेश्वर, गाजरवाडी, नैताळे, सोनेवाडी, श्रीरामनगर, शिवरे, शिवडी, खेडे, वनसगाव, खडक माळेगाव, सारोळे खुर्द, रानवड आदी गावांसाठी सोयीस्कर ठरले.
2009 पासुन मार्केटची सुरवात
यावेळी भीमराज काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, खानगांव नजिक व उगांव परीसरातील द्राक्षे उत्पादकांच्या मागणीनुसार बाजार समितीने दि. 02 फेब्रुवारी, 2009 पासुन खानगांव नजिक व दि. 26 जानेवारी, 2004 पासुन उगांव येथे द्राक्षे हंगामात द्राक्षमणी लिलावास सुरूवात केली आहे. गेल्या 20 ते 21 वर्षात या केंद्रांस शेतकरी, अडते, व्यापारी व कामगारांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला असुन बाजार समितीच्या सदर उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या पैशास सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. बाजार समितीने सदरचे खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यापुर्वी द्राक्षमणी खरेदीदार थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शिवार खरेदीद्वारे द्राक्षमण्यांची खरेदी करीत असे. स्पर्धा नसल्यामुळे बाजारभावात लुट तसेच पैशांची हमी नसल्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक फटका बसत असे.
42 कोटी रूपयांची उलाढाल
बाजार समितीने शेतकरी हित विचारात घेऊन दरवर्षी द्राक्ष हंगामात उगांव, खानगांव नजिक, नैताळे व मानोरी खुर्द येथे द्राक्षमणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खानगांव नजिक व उगांव येथे दरवर्षी द्राक्षमण्यांच्या खरेदी-विक्रीतुन दोन ते अडीच कोटी रूपयांची उलाढाल होते. खानगांव नजिक केंद्रावर सन 2009 ते 2024 पर्यंत 06 लाख क्रेटस् द्राक्षमण्यांची आवक होऊन सुमारे 16.50 कोटी रूपयांची उलाढाल याठिकाणी झाली आहे. तर उगांव केंद्रावर सन 2004 ते 2024 पर्यंत 17 लाख क्रेटस् द्राक्षमण्यांची आवक होऊन सुमारे 42 कोटी रूपयांची उलाढाल झाली आहे.
द्राक्षमणी खरेदीसाठी अनेक व्यापारी उपस्थित असल्याने उघड व स्पर्धात्मक लिलावाद्वारे द्राक्षेमण्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळतात. त्यामुळे द्राक्षे उत्पादक बांधावर द्राक्षेमणी विक्री न करता सदर खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षमणी विक्रीस प्राधान्य देतात. यावेळी बाजारसमितीचे सदस्य प्रविण कदम, माजी सदस्य पोपटराव रायते, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी मनोगत व्यक्त करून बाजार समितीच्या सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.