Gahu Bajarbhav : रब्बी हंगामातील गव्हाची काढणी सुरू होताच बाजारात आवक झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र आवक वाढताच गव्हाच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Gahu Bajarbhav)
वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत महिनाभरात गव्हाच्या दरात तब्बल ३५५ रुपये प्रति क्विंटल घसरण नोंदवली गेली आहे.(Gahu Bajarbhav)
६ फेब्रुवारी रोजी बाजार समितीत गव्हाला २,४२० ते २,९३० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत होता. त्या दिवशी बाजारात गव्हाची आवक केवळ १०० क्विंटल इतकी होती. मात्र रब्बी हंगामातील काढणीला वेग आल्याने बाजारात गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.(Gahu Bajarbhav)
वाशिम बाजार समितीत गव्हाची आवक तब्बल २,३५० क्विंटल झाली. मात्र आवक वाढताच दरात मोठी घसरण झाली असून गव्हाला २,०६५ ते २,२७० रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळाला. त्यामुळे महिनाभरात गव्हाच्या दरात ३५५ रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येते.(Gahu Bajarbhav)
काढणीच्या हंगामात चांगल्या दराच्या अपेक्षेने गहू बाजारात आणणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र कमी दराचा फटका बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आवक वाढताच व्यापाऱ्यांकडून दर पाडले जात असल्याचा आरोपही काही शेतकरी करत आहेत.
पुढील काही दिवसांत रब्बी हंगामातील गव्हाची काढणी आणखी वेग घेणार असल्याने बाजारात आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता व्यापारी आणि शेतकरी वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
सध्या दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असली तरी बाजारातील मागणी, आवक आणि गुणवत्तेनुसार पुढील काळात दरात बदल होऊ शकतो, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.
