Flower Market : सध्या फुलांच्या बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत उत्पादन कमी झाल्याने आणि लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने विविध फुलांचे भाव गगनाला भिडले आहेत. (Flower Market)
परिणामी फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असून त्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे.(Flower Market)
राजूर परिसरात सध्या मोगरा, गुलाब, झेंडू, जास्वंद, गालांडा, काकडा, बिजली आणि निशिगंधा या फुलांना मोठी मागणी आहे. (Flower Market)
कमी उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. सध्या मोगऱ्याला प्रतिकिलो सुमारे ९०० रुपये, काकड्याला तब्बल १२०० रुपये, गुलाबाला १५० रुपये आणि झेंडूला सुमारे ११० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. तसेच गालांडा ५० रुपये, बिजली ८० रुपये आणि निशिगंधा सुमारे २५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.
राजूर येथे गणपती दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. मंदिर परिसरात फुलांची मोठी मागणी असते. त्यामुळे भाविकांना फुले खरेदी करताना यंदा थोडा जास्त खर्च करावा लागत आहे. अनेकजण स्वतंत्र फुले घेण्याऐवजी तयार फुलांच्या हारांना पसंती देताना दिसत आहेत.
राजूर परिसरात फुलशेती करणारे शेतकरी तुलनेने मोजकेच आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात फुलांची उपलब्धता मर्यादित राहिली असून मागणी जास्त असल्याने भाव वाढले आहेत.
मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा फुलांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे.
फूल उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले की, सध्या बाजारभाव समाधानकारक असल्यामुळे त्यांनी उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. विशेषतः मोगरा, गुलाब आणि झेंडू या फुलांना जास्त दर मिळत असल्याने अनेक शेतकरी या पिकांकडे वळताना दिसत आहेत. चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांना खर्च भागविण्यासोबतच पुढील हंगामासाठी काही प्रमाणात बचतही करता येत आहे.
उन्हाळ्यामुळे फुलांचे उत्पादन कमी झाले होते. मात्र सध्या बाजारात चांगला दर मिळत असल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या उत्पन्नातून शेतीचा खर्च भागविण्यासोबतच पुढील हंगामासाठी तयारी करता येईल.- हरिभाऊ गायकवाड (लोणगाव), फूल उत्पादक शेतकरी
सध्या मोगरा, गुलाब आणि झेंडू यांसारख्या फुलांना मोठी मागणी आहे. उन्हाळ्यामुळे उत्पादन कमी असल्याने बाजारात भाव वाढले आहेत. या चांगल्या दराचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. आगामी काळात लग्नसराई सुरू असल्याने फुलांची मागणी कायम राहण्याची शक्यता आहे.- सतीश पिंपळे, फूल विक्रेता
दरम्यान, लग्नसराई आणि धार्मिक कार्यक्रमांमुळेही फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे फुलांच्या बाजारात सध्या तेजी कायम असून फूल उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
हे ही वाचा सविस्तर : Halad Market : सोन्यासारख्या हळदीला भाव नाही; युद्धामुळे बाजारात मंदी
अधिक वाचा : Agri Market Export : आखाती तणावाचा फटका; हळद-केळी निर्यात थांबली का? वाचा सविस्तर
