Fertilizer Shortage : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या वाढत्या किमती आणि संभाव्य टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.(Fertilizer Shortage)
आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम खतांच्या पुरवठा साखळीवर होत असून, यंदाच्या हंगामात खतांची उपलब्धता आणि दर हे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Fertilizer Shortage)
आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा थेट परिणाम
भारतामध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचा मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून आहे. सध्या आखाती देशांतील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे वाहतूक व पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
यामुळे खतांच्या किमतीत १५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. परिणामी पेरणीच्या ऐन हंगामात शेतकऱ्यांना खतटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
वाशिम जिल्ह्यात मोठी मागणी
वाशिम जिल्हा सोयाबीन, तूर आणि कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. याशिवाय ज्वारी, मूग, उडीद आणि हळद पिकांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.
दरवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे ७५ हजार मेट्रिक टन खतांची मागणी असते. त्यामुळे पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खतांच्या दरात मोठी वाढ
खतांच्या किमतीत गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे.
20:20:00+13 खत : १३५० रु. वरून १४५० रु.
10:26:26 खत : १९०० रु. वरून २१०० रु.
14:35:14 खत : १७०० रु. वरून २०५० रु.
SSP : ६०० रु. वरून ७०० रु.
12:32:16 खत : १४०० रु. वरून १७५० रु.
MOP (पोटॅश) : १८०० रु. वरून २१०० रु.
ही दरवाढ शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी भर घालणारी ठरत आहे.
सध्या पुरेसा साठा, पण भविष्यात चिंता
जिल्ह्यात सध्या काही प्रमाणात खतांचा साठा उपलब्ध आहे.
खरीप २०२५ मध्ये ८८,८५४ मे.टन खत उपलब्ध झाले
त्यापैकी ७४,१९८ मे.टन वितरीत झाले
सुमारे १४,६५६ मे.टन साठा शिल्लक
तसेच रब्बी हंगामातही काही प्रमाणात साठा उपलब्ध असला तरी आगामी खरीप हंगामात मागणी वाढल्यास टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
'फार्मर आयडी'मुळे पारदर्शकता
खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने 'फार्मर आयडी' प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खतांचे योग्य वाटप होऊन गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या वाढत्या किमती आणि संभाव्य टंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. योग्य नियोजन, संतुलित खत वापर आणि वेळेत पुरवठा यावरच यंदाच्या हंगामाचे यश अवलंबून राहणार आहे.
साठेबाजी टाळा
सध्या वाशिम जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा आहे. मात्र, भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी खतांचा वापर वाजवी प्रमाणात करावा आणि घाबरून साठेबाजी टाळावी.- अभिजीत देवगिरकर,कृषी विकास अधिकारी
