नाशिक :द्राक्षांचा हंगाम (Grape Season) नुकताच संपला. यंदाच्या हंगामात मागील वर्षाच्या तुलनेत द्राक्षाने भरलेले १८७ कंटेनर विदेशात कमी पोहोचू शकले, मात्र असे असूनही भाव चांगला मिळाल्याने यंदाच्या हंगामात परकीय चलन मागील वर्षाच्या तुलनेने केवळ एक कोटीने कमी झाले.
२० मे अखेर १०९७.२५ कोटींचे परकीय चलन द्राक्ष निर्यातीतून (Grape Export) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी पडले. युरोपीय देशात ११०१६३.२०२ मेट्रिक टन, तर नॉन युरोपीय देशात ४६५८७.८८२ मेट्रिक टन द्राक्ष समुद्रीमार्गे पोहोचले.
नाशिक ही द्राक्षाची पंढरी असून, महाराष्ट्र राज्याचा देशात द्राक्ष उत्पादनात (Grape Production) प्रथम क्रमांक आहे. त्यात द्राक्ष निर्यातीपैकी ९१ टक्के निर्यात ही नाशिक जिल्ह्यातून होते. हंगाम संपल्याने द्राक्षांनी बाजारातून निरोप घेतला आहे. ३० एप्रिलअखेर नाशिक जिल्ह्यातून १ लाख ५६ हजार ३५९ मेट्रिक टन द्राक्ष समुद्रमार्गे विदेशात पोहोचले होते. त्यानंतरच्या पंधरा दिवसांत ३९२ मेट्रिक टनांची वाढ झाली.
रशिया, मलेशिया अन् संयुक्त अरब अमिरातीसाठी महिनाभरात ५५० कंटेनर रवाना झाले. मात्र, ही वर्ष आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेने कमी आहे. कंटेनरची संख्या यंदा कमी झाली तरी द्राक्षांना भाव चांगला मिळाल्याने परकीय चलन फारसे कमी झाले नाही. जिल्ह्यात १३ तालुक्यांत सरासरी ५८ हजार ४१८ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड केली जाते.
तीन वर्षांत द्राक्षाला सर्वाधिक भाव
किरकोळ बाजारात यंदा द्राक्ष ११० ते १३० रुपये किलो मिळाले. पूर्ण सिझनमध्ये भाव वाढतेच होते. गत तीन वर्षात द्राक्षांचे दर यंदा सर्वाधिक राहिले. वातावरणात कधी कधी ढगाळ, तर कधी कोरडेपणा असल्याने द्राक्ष दहा ते पंधरा दिवस अगोदरच पक्च होत राहिले. ते यावर्षी जवळपास दोन आठवडे लवकर बाजारात आले होते, तर दोन आठवडे लवकर बाजारातून संपलेदेखील.
रशिया-युक्रेन युद्धाची धग कमी, तरी आर्थिक फटका
रशिया-युक्रेन युद्धाची धग काहीशी कमी झाली असली तरी त्याचा फटका द्राक्ष निर्यातदारांना बसला. युद्धामुळे द्राक्षाची निर्यात युक्रेनमार्गे न होता दक्षिण आफ्रिकेमार्गे लांबचा पल्ला गाठून करण्यात आली. परिणामी दर कंटेनरचे भाडे वाढले. बांगलादेशने प्रतिकिलो द्राक्षासाठी लागू केलेले १०० रुपये आयातशुल्क हे कारण निर्यातीवर काहीसे परिणाम करणारे ठरले.
अवकाळी पावसाचा फटका येणाऱ्या हंगामातील द्राक्ष निर्यातीला बसू शकतो; कारण या परिस्थितीत फळधारणेसाठी पोषक वातावरण नाही. जमिनीत पाण्याचा ताण हवा; पण तशी परिस्थिती नसून द्राक्षाच्या छाटणी झालेल्या मंडपास सूर्यप्रकाशाची गरज आहे. सरकारने स्पेनच्या धर्तीवर द्राक्षबागेसाठी क्रॉप कव्हर उपलब्ध करून द्यावे.
- कैलास भोसले, प्रदेशाध्यक्ष, द्राक्ष बागायत संघ