जळगाव : 'सीसीआय'ने चालू हंगामातील तब्बल ८४ लाख गाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी काढल्या आहेत. सीसीआयचा हा माल बाजारात आल्यामुळे खासगी बाजारात मध्यंतरी वधारलेले कापसाचे दर आता काही प्रमाणात खाली आले आहेत. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कापसाच्या दराने चांगली भरारी घेतली होती. पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात कापसाला ७,६०० ते ७,८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत होता. मात्र, सीसीआयने आपल्याकडील मालाची आता विक्री सुरू करताच हे दर आता ७४०० ते ७६०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. जरी काही ठिकाणी चांगल्या दर्जाच्या कापसाला ७८०० रुपयांचा भाव टिकून असला, तरी सरासरी दरांमध्ये २०० ते ३०० रुपयांची घट झाल्याचे चित्र आहे.
खान्देशात कापूस उत्पादनात मोठी घट
जळगाव जिल्ह्यात यंदा कापसाची लागवड १ लाख हेक्टरने कमी झाली. लागवड कमी असताना, अतिवृष्टीमुळे उत्पादनातही मोठी घट झाली आहे. दरवर्षी जानेवारीअखेरपर्यंत खान्देशात १० ते ११ लाख गाठींची खरेदी होते. मात्र, यंदा दि. २९ जानेवारीपर्यंत केवळ ६ लाख गाठींचीच खरेदी होऊ शकली आहे, अशी माहिती 'खान्देश जिनिंग असोसिएशन'चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली आहे.
कापूस बाजाराची थोडक्यात स्थिती
- पूर्वीचा दर : ७,६०० - ७,८०० रुपये
- सध्याचा सरासरी दर: ७,४०० ७,६०० रुपये
- घसरण : २०० ते ३०० रुपये
- मुख्य कारण : सीसीआयकडून ८४ लाख गाठींची विक्री सुरू
- खान्देशात खरेदी : ६ लाख गाठी
आयात शुल्काचा परिणाम पुसट..?
केंद्र सरकारने ३१ डिसेंबर २०२५ नंतर कापूस आयातीवर ११ टक्के आयात कर लागू केला होता. या निर्णयामुळे परदेशातील कापूस महाग झाल्याने स्थानिक बाजारात भारतीय कापसाला मोठी मागणी निर्माण झाली होती आणि भाव वाढले होते. मात्र, आता सीसीआयने आपल्याकडील मालापैकी ८४ लाख गाठींची विक्री सुरू केल्यामुळे दरवाढीला ब्रेक लागला आहे.
