Cotton Market : कापसाच्या दरात किंचित वाढ झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत असतानाच, तुरीच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता उमटली आहे. (Cotton Market)
मूर्तिजापूरसह आसपासच्या बाजारपेठांमध्ये कापसाचे दर प्रति क्विंटल ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, तूर मात्र ५ हजार ५०० ते ५ हजार ८०० रुपयांवर घसरली आहे. (Cotton Market)
खरिपाच्या तयारीला लागलेले शेतकरी उत्पादन खर्च भागवण्यासाठी बाजारात माल विकायला धाव घेत आहेत. दरातील या चढ-उतारांमुळे शेतकऱ्यांमध्ये संमिश्र भावना व्यक्त होत आहेत.(Cotton Market)
मूर्तिजापूर येथील स्थानिक बाजारपेठेत सुरू असलेल्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये अलीकडेच काही हालचाल दिसून आली आहे. कापसाच्या दरात थोडीशी वाढ झाली असून, प्रति क्विंटल ७ हजार ते ७ हजार ४०० रुपये दराने विक्री होत आहे. (Cotton Market)
मात्र, दुसरीकडे तुरीच्या दरात मोठी घसरण झाली असून सध्या तूर केवळ ५ हजार ५०० ते ५ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली जात आहे. या घसरणीमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Cotton Market)
कपाशीला थोडा दिलासा, पण तुरीमुळे फटका
गेल्या काही आठवड्यांपासून कापसाचे दर स्थिर होते, मात्र अलीकडील वाढ शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासा घेऊन आली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर साठवलेला कापूस आता हळूहळू विक्रीस काढत असल्याने बाजारात काही प्रमाणात वाढ जाणवते. या परिस्थितीमुळे दर चांगले राहिल्यास लवकरच बाजारात कापसाची आवक १ हजार क्विंटलपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
शेतीमाल विक्रीमागे आर्थिक गरज
तुरीच्या दरात झालेल्या घसरणीने मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. उत्पादन खर्च अधिक असूनही विक्री दर कमी मिळाल्याने शेतकऱ्यांना तोट्यात माल विकावा लागत आहे. शिवाय, काही शेतकऱ्यांनी जुने कर्ज फेडले नसल्याने त्यांना नवीन कर्ज मंजूर झालेले नाही. परिणामी बी-बियाणे, खते खरेदीसाठी आवश्यक पैसा उभारण्यासाठी शेतकरी माल कमी दराने विकण्यास भाग पाडले जात आहेत.
थेट विक्रीचा लाभ... पण अजूनही आशा
मूर्तिजापूरमधील जिनिंग अॅंड प्रेसिंग फॅक्टरीचे संचालक ॲड. अविन अग्रवाल यांनी सांगितले की, शेतकरी स्वतः आपल्याजवळील माल बाजारात विकतात आणि त्यांना तत्काळ पैसे मिळतात. यामुळे कापूस साठवलेल्यांना आता दरवाढीचा थोडाफार फायदा होत होईल.
अंबिकापूरचे शेतकरी राजू इंगळे म्हणाले, दरवर्षी १०० ते १५० क्विंटल कापूस होतो. भाव चांगला मिळावा म्हणून शेवटपर्यंत थांबतो. पण यावर्षी अपेक्षाभंग झाला. आता लवकर विक्री करावी लागतेय.
१० हजाराचा भाव? फक्त अपेक्षा
अनेक कापुस उत्पादकांनी अजूनही १० हजार रुपये प्रति क्विंटल भावाच्या आशेने कापूस साठवून ठेवला आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत अशा दरांची शक्यता धूसर दिसत आहे. याउलट तुरीच्या दरात सुरू असलेली घसरण शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे.
सध्या शेतीमालाच्या बाजारभावांमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या खर्चाचा भार आणि उत्पादनातील अनिश्चितता लक्षात घेता शासनाकडून अधिक सहकार्याची गरज आहे. भाव व धोरणे स्पष्ट असतील, तरच शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.
हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तूर बाजारभाव : कुठे दर वधारले, कुठे राहिले स्थिर? वाचा सविस्तर