Chana Procurement :खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर दबावाखाली असताना लातूर जिल्ह्यात पणन मंडळाच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.(Chana Procurement)
हमीभावाचा आधार मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हरभरा खरेदी केंद्रांकडे वळवला असून, आतापर्यंत २४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या २०९.३४ कोटी रुपयांच्या हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. (Chana Procurement)
ऑनलाइन नोंदणीसाठी शासनाने १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खरेदीला वेग; कोट्यवधींची उलाढाल
जिल्ह्यात पणन मंडळाच्या सुमारे १०० हून अधिक केंद्रांवर हरभरा खरेदीचा वेग वाढला आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत जवळपास ४ लाख क्विंटल हरभरा विक्रीसाठी आणला आहे.
नोंदणी केलेले शेतकरी : २४,५४४
एकूण खरेदी : ३,५६,३०४ क्विंटल
खरेदी मूल्य : २०९.३४ रु. कोटी
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा : ८७.२८ रु. कोटी
१०७ केंद्रांना मान्यता; खरेदी सुरू
पणन मंडळाने जिल्ह्यातील १०७ खरेदी केंद्रांना हमीभावाने हरभरा खरेदीची परवानगी दिली आहे. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या, ६ बाजार समित्या यांचा समावेश आहे.
तसेच, मार्केटिंग फेडरेशनच्या २३ केंद्रांवरूनही खरेदी सुरू असून, आतापर्यंत ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक खरेदी झाली आहे.
नोंदणीस मुदतवाढ; १५ एप्रिलपर्यंत संधी
पूर्वी हरभरा नोंदणीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ होती. मात्र, सध्याचे कमी बाजारभाव आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने ही मुदत वाढवून ६ ते १५ एप्रिल दरम्यान नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
७ केंद्रांवर खरेदीच नाही
१०७ मंजूर केंद्रांपैकी ७ केंद्रांनी नोंदणी करूनही प्रत्यक्ष खरेदी सुरू केलेली नाही.
या केंद्रांवर १५० हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, खरेदी न झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. यात २ बाजार समित्यांचाही समावेश आहे.
बाजार समित्यांचा संमिश्र प्रतिसाद
यंदा पणन मंडळाने बाजार समित्यांनाही खरेदीची मुभा दिली असली तरी प्रतिसाद संमिश्र आहे.
जिल्ह्यातील ६ पैकी ४ बाजार समित्यांनीच खरेदी सुरू केली
चाकूर आणि औसा समित्यांनीच सक्रियपणे खरेदी करून
३.०५ कोटी रु. शेतकऱ्यांना दिले
बाजार समित्यांच्या केंद्रांवर
६८६ शेतकरी नोंदणीकृत
११,०५१ क्विंटल खरेदी
हरभरा नोंदणीसाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे त्यांनी तातडीने ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी. एप्रिलअखेरपर्यंत खरेदी सुरू राहणार आहे.- एस. व्ही. बदनाळे, उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ, लातूर
शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा आधार
खुल्या बाजारात कमी दरामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत असताना, पणन मंडळाच्या हमीभाव खरेदीमुळे आर्थिक आधार मिळत आहे.
मात्र, सर्व केंद्रांवर खरेदी सुरळीत सुरू होणे आणि पैसे वेळेवर मिळणे गरजेचे असल्याची मागणी शेतकरी करत आहेत.
हे ही वाचा सविस्तर :Harbhara Kharedi : हरभऱ्याला हमी दर मिळणार का? नोंदणी संपल्याने शेतकरी चिंतेत
