बालाजी आडसूळ
'पेरलं ते उगवेल का, उगवलेलं पिकेल का आणि पिकलं ते विकेल का?' हा शेतकऱ्यांच्या आयुष्यातील कायमचा प्रश्न आजही तसाच उभा आहे.(Banana Market)
उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील परतापूर येथील केळी उत्पादक शेतकरी सध्या अशाच कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत.(Banana Market)
आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे निर्यातीवर परिणाम झाला असून त्याचा थेट फटका ग्रामीण भागातील केळी उत्पादकांना बसत आहे. परिणामी कष्टाने पिकवलेला माल विक्रीविना झाडावरच पिवळा पडू लागल्याचे चित्र दिसत आहे.(Banana Market)
अवर्षणप्रवण भागात उभारली केळीची बाग
कळंब तालुक्यातील परतापूर परिसर हा अवर्षणप्रवण भाग मानला जातो. बालाघाट पठारावर वसलेल्या या भागात पाण्याची टंचाई नेहमीच जाणवते.
अशा प्रतिकूल परिस्थितीतही येथील प्रयोगशील शेतकरी अभिमन्यू गायकवाड यांनी जिद्दीने केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
आपल्या एक एकर क्षेत्रात त्यांनी 'जी-नाईन' (G-9) जातीच्या केळीची लागवड केली. सुमारे ५ बाय ७ फूट अंतरावर तब्बल एक हजार रोपे लावून त्यांनी बाग फुलवली.
वर्षभर काबाडकष्ट; बागेत भरघोस घड
केळीची लागवड केल्यानंतर वर्षभर त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. वेळेवर सिंचन, खत व्यवस्थापन, कीडनियंत्रण याकडे विशेष लक्ष दिले.
मेहनतीचे फळही मिळाले आणि बागेत भरघोस घड लगडले. बागेतील सुमारे चार टन केळीचा माल पहिल्या तोडीसाठी तयार झाला. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली होती.
आंतरराष्ट्रीय तणावाचा थेट परिणाम
मात्र, याच काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला. या परिस्थितीमुळे आखाती देशांकडे होणाऱ्या फळांच्या निर्यातीवर मोठे सावट आले आहे.
निर्यातदार आणि मोठ्या व्यापाऱ्यांनी खरेदीतून हात आखडता घेतल्याने स्थानिक बाजारपेठेत केळीची मागणी अचानक घटली आहे. परिणामी व्यापारी बाजारात फिरकण्यासही तयार नसल्याचे शेतकरी सांगतात.
झाडावरच पिवळी पडणारी केळी
केळी हे अत्यंत नाशवंत पीक असल्यामुळे ते जास्त काळ झाडावर ठेवणे शक्य नसते. परंतु व्यापारी नसल्याने शेतकऱ्यांना माल तोडून विक्री करता येत नाही. त्यामुळे कष्टाने पिकवलेली केळी आता झाडावरच पिवळी पडू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत वर्षभराची मेहनत वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
उत्पादन खर्चही निघण्याची शंका
केळी लागवडीसाठी रोपे, खत, औषधे, मजुरी आणि सिंचनावर मोठा खर्च करावा लागतो. परंतु बाजारात मागणी नसल्याने उत्पादन खर्चही निघेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण डळमळीत होण्याची शक्यता आहे.
शासकीय मदतीची मागणी
या पार्श्वभूमीवर शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
केळी हे नाशवंत पीक असल्याने हेक्टरी आर्थिक मदत जाहीर करावी किंवा नाफेडच्या धर्तीवर खरेदी केंद्र सुरू करून केळीची खरेदी करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्याची आर्त हाक
वर्षभर पोटच्या पोरासारखी केळीची बाग जपली. आता डोळ्यादेखत माल खराब होत आहे. व्यापाऱ्यांना फोन केला तर ते जागतिक परिस्थितीचे कारण सांगतात. मेहनतीचे चीज होण्याऐवजी निराशा पदरी पडत आहे. आता पुढे कसं जगायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. - अभिमन्यू गायकवाड, शेतकरी
जागतिक पातळीवरील घडामोडींचा थेट परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर होत असल्याचे हे उदाहरण असून, योग्य वेळी मदत न मिळाल्यास केळी उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
