Banana Market : गेल्या काही महिन्यांपासून दरघटीमुळे अडचणीत सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.(Banana Market)
पवित्र रमजान महिन्याच्या तोंडावर बाजारात मागणी वाढल्याने बुधवारी वसमत कृषी बाजारातकेळीला प्रतिक्विंटल २ हजार १०० रुपयांचा विक्रमी भाव मिळाला. या दरवाढीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आहे.(Banana Market)
दोन महिन्यांपूर्वीची घसरण; बागांवर नांगर फिरवण्याची वेळ
दोन महिन्यांपूर्वी केळीच्या दरात मोठी घसरण झाली होती. उत्पादन खर्च भागणेही कठीण झाल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते.
कमी भावामुळे काही शेतकऱ्यांनी संतापातून उभ्या केळी बागांवर नांगर फिरविल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सध्याची दरवाढ शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरली आहे.
रमजानमुळे वाढली मागणी
१९ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या रमजान महिन्यात फळांना, विशेषतः केळीला मोठी मागणी असते. इफ्तारमध्ये केळीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने बाजारपेठेत खरेदी वाढली आहे.
१८ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात मागणीचा प्रभाव स्पष्ट दिसून आला आणि दर कडाडले. प्रतिक्विंटल २ हजार १०० रुपयांचा दर मिळाल्याने अनेक उत्पादकांनी समाधान व्यक्त केले.
दोन महिन्यांपूर्वीची परिस्थिती अत्यंत भयावह होती. मात्र आता मिळणारा भाव पाहता केळी बागेसाठी केलेला खर्च आणि मेहनत सार्थकी लागल्यासारखे वाटते.- भगवान जंबरे, केळी उत्पादक
वसमतचा केळी पट्टा सुखावला
वसमत तालुका केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील केळी चवीला उत्कृष्ट असल्याने परराज्यातही तिची मागणी असते.
सध्याच्या दरवाढीमुळे तालुक्यातील आर्थिक चक्राला गती मिळणार आहे. व्यापाऱ्यांच्या मते, रमजान काळात मागणी टिकून राहिल्यास दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
पुढील हंगामाकडे अपेक्षेने नजर
दरातील सुधारणा कायम राहिल्यास शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढणार असून पुढील हंगामात लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या तरी वसमतच्या केळी पट्ट्यात आनंदाचे वातावरण असून सोन्यासारखा भाव हीच चर्चा रंगली आहे.
