नाशिक : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड/ एसीसीएफ मार्फत सन २०२५-२६ साठी राज्यात तूर, हरभरा (चना) खरेदी करण्यात येणार आहे. तूरीचा बाजारभाव व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तूरीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी २४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच चना खरेदीकरिता शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२६ पर्यंत नोंदणीची मुभा आहे. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत ऑनलाईन नोंदणी करावी, असे अवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, नाशिक चे उपसरव्यवस्थापक एस.वाय.पुरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
नोंदणी नंतर १ मार्च २०२६ पासून पुढे ६० दिवस प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शासनामार्फत हंगाम २०२५ -२६ साठी तेलबिया व कडधान्य खरेदी करिता महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांची नोडल संस्था म्हणून नोंदणी केली आहे. नाशिक विभागात एकूण २६ ठिकाणी खरेदी केंद्रास मान्यता मिळाली आहे.
नाशिक जिल्ह्यात ११, अहिल्यानगर जिल्ह्यात ३१, धुळे जिल्ह्यात २ व जळगाव जिल्ह्यात १२ अशी खरेदी केंद्रे आहेत. शेतकरी बांधवांनी जवळच्या खरेदी केंद्रावर जावून आपल्या शेतमालाची नोंदणी करावी. शेतमाल कमी किंमतीत विक्री न करता शासकीय आधारभूत दराने खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही उपसरव्यस्थापक पुरी यांनी केले आहे.
