Amravati Bajar Samiti : अमरावती जिल्ह्यात गुरुवारी दुपारीच्या सुमारास जोर'धार' बरसलेल्या अवकाळी पावसाने अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रि-मान्सून उपाययोजनांचा बोजवारा उडविला. (Amravati Bajar Samiti)
तो इतका की कोट्यवधी रुपये खर्चुन बनविलेल्या धान्य शेडलादेखील मोठी गळती लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या पावसाने त्या शेडमध्ये तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेडच्या आत ठेवलेले शेकडो पोती सोयाबीन ओले झाले. ते पोत्यात भरण्यासाठी मजुरांना मोठी कसरत करावी लागली. (Amravati Bajar Samiti)
अवकाळी पावसामुळे सुमारे १ हजार ते १,२०० पोती भिजल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. दरम्यान, अचानकच पाऊस कोसळू लागल्याने बाजार समितीच्या आवारात खुल्या जागेवर धान्याने भरून ठेवलेली पोतीदेखील ओली झाली. (Amravati Bajar Samiti)
सुमारे अर्धा ते पाऊण फूट पाणी साचल्याने ते पाणी पोत्यातदेखील शिरले. तर दुसरीकडे बाजार समिती आवारातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या भल्यामोठ्या टिनशेडला गळती लागल्याने त्यातील सोयाबीन पुरते ओले झाले.
त्या शेडसह नाल्यांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आपण जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविला. मात्र, त्याला मंजुरी मिळाली नसल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाळा तोंडावर आला असताना तेथील नालींची दुरुस्तीदेखील रखडली आहे.
तो माल व्यापाऱ्यांचा
गुरूवारी बाजार समितीच्या आवारात ९ हजार पोत्यांची आवक झाली. सकाळी ९ व ११ ला लिलाव झाला. पाऊस २ च्या सुमारास आला. त्यामुळे आवारात व्यापाऱ्यांनी विकत घेतलेला धान्याचा माल होता. अचानक आलेल्या पावसाचा त्या मालाला मोठा फटका बसला.
सर्वत्र घाणच घाण
बाजार समितीत अवकाळी पावसामुळे एकीकडे धान्याच्या मालाचे मोठे नुकसान झाले. तर दुसरीकडे घाणच घाण असे चित्र निर्माण झाले. पावसामुळे तेथील अस्वच्छतेत मोठी भर पडली. संपूर्ण बाजार समिती आवारात पाणी साचले.
गुरुवारी दुपारी आलेल्या अवकाळी पावसाने व्यापाऱ्यांच्या अंदाजे १ हजार पोत्यांचे तर, शेतकऱ्यांच्या ५० पोती धान्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धान्यशेडच्या दुरुस्तीचा प्रस्ताव 'डीडीआर'कडे पाठविला. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. - दीपक विजयकर, सचिव, बाजार समिती