सातारा : स्थानिक उन्हाळी कांद्याची बाजारात आवक वाढल्याने आठ दिवसात दरात क्विंटलमागे एक हजाराने उतार आला आहे. सातारा बाजार समितीत क्विंटलला १ हजार ६०० पर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसू लागलाय.
जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र विस्तारत आहे. अनेक शेतकरी हे वर्षभर कांदा पीक घेतात. येथील कांदा पुणे, लोणंद, सोलापूर, सांगलीच्या बाजार समितीत जातो. यंदाही उन्हाळी कांद्याचे क्षेत्र मोठे होते.
मागील १५ दिवसांपासून उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागला आहे. त्यातच आवक अधिक असल्याने दरात उतार आला आहे. महिन्यापूर्वी कांद्याला क्विंटलला चार हजारांपर्यंत भाव मिळत होता.
तर मागील आठवड्यात अडीच हजार रुपये क्विंटलने कांदा विकला. पण, सध्या १ हजार ६०० पर्यंत दर खाली आला आहे. सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील कांदा येऊ लागला आहे.
त्यातच आवक अधिक असल्याने दरात घसरण झाली आहे. क्विंटलला ३०० पासून १ हजार ६०० पर्यंत दर येत आहे. यामुळे दोन महिन्यानंतर कांद्याच्या दरात चांगलाच उतार आल्याचे दिसून आले.
महिन्यापूर्वी कांद्याला चांगला दर मिळाला होता. त्यानंतर उतार येत गेला. आता तर बाजारात उन्हाळी कांद्याची आवक अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. यामुळे दर आणखी घसरला आहे. क्विंटलला १५०० ते १६०० रुपयेच दर येत आहे. आवक चांगली असेपर्यंत कांद्याला दर कमीच राहील. यामुळे शेतकरी चाळीत कांदा साठवून दर आल्यानंतर त्याची विक्री करू शकतात. - योगेश शिंदे, कांदा उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: मृत शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर वारस नोंदी होणार आता झटपट; सरकारने घेतला हा मोठा निर्णय