श्यामकुमार पुरे
परराज्यासह विदेशात हिरव्या मिरचीची मागणी घटल्याने भाव घसरले आहेत. सुरुवातीला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाणारी मिरची सध्या ४ हजारांपर्यंत आली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. तालुक्यात सध्या दररोज सुमारे ५०० टन मिरचीची आवक होत आहेत.
सिल्लोड तालुक्यात दरवर्षी उन्हाळी मिरचीची मोठ्या संख्येने लागवड केली जाते. पावसाळ्याच्या तोंडी सदर मिरचीचे उत्पादन सुरू होते. येथील मिरची प्रसिद्ध असून, उच्च प्रतीची असल्याने परराज्यासह विदेशातही तिची निर्यात केली जाते. चांगला भाव मिळेल, या आशेवर यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली आहे.
सध्या घडीला तालुक्यात दररोज ५०० टन मिरचीची आवक होत आहे. मात्र पावसामुळे मिरची ओली होत आहे. यामुळे या स्थितीत प्रक्रिया केल्याशिवाय तिची निर्यात होऊ शकत नाही.
तसेच मिर्चीवर काही प्रमाणात व्हायरसचा अटॅक झालेला आहे. किंवा बहुतेक तोडे संपत आल्याने मिरचीची प्रत घसरली आहे. यामुळे भाव घसरल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांना १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दर हिरव्या मिरचीला मिळाला. मात्र आता हा दर ४ हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.
निर्यातीत अडथळे
सिल्लोडची उच्च प्रतीची हिरवी मिरची मुंबई बंदरावरून जहाजाने आजही दुबईला निर्यात होत आहे. मात्र पावसामुळे मिर्ची ओली होत असल्याने एक्सपोर्ट होण्यास अडथळे निर्माण झाले आहे.
याशिवाय बांगलादेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार या परराज्यात लोकलच्या मिरचीचे आगमन झाल्याने भाव कमी झाले आहेत. तालुक्यात मिरची ही गोळेगाव, आमठाणा, शिवना, पिंपळगाव, घाटनांद्रा, जाफराबाद, भोकरदन या भागातून मोठ्या प्रमाणात येते.
असा घसरला भाव (क्विंटलमध्ये)
मिरचीचा प्रकार | १५ जूनपर्यंत भाव | नंतरचा भाव |
---|---|---|
पिकाडोर मिर्ची | ५ हजार रुपये | २५०० रुपये |
बळिराम | ५ हजार रुपये | १,२०० रुपये |
तेजाफोर | १२ हजार रुपये | ३,५०० ते ४ हजार रुपये |
शिमला | ५ हजार रुपये | ३ हजार रुपये |
तलवार | १० हजार रुपये | ४ हजार रुपये |
ज्वेलरी | ५ हजार रुपये | ३ हजार रुपये |
आरमार | १० हजार रुपये | ३५०० रुपये |
नुकत्याच झालेल्या युद्धाचा परिणाम सर्वच बाजार पेठेवर झाला होता. आता देश-विदेशांत व परराज्यांत येत्या आठ दिवसांत मिर्चीची मागणी वाढेल. परिणामी काही प्रमाणात का होईना भाव वाढतील, असा अंदाज आहे. - राजू काळे, व्यापारी, शिवना.