युनूस नदाफ
दिवसेंदिवस शेती व्यवसायाला घरघर लागली असून संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील पार्टी म. येथील तरुण शेतकरी आकाश देशमुख यांनी दोन एकरात शेवंती फुलांची लागवड केली होती.
परंतु वेळेवर फूल तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे आणि बाजारपेठेत फुलाला कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे दोन एकरातील फुलशेतीवर नांगर फिरवला आहे. फुलशेतीतून मिळणाऱ्या उत्पादनातून दुसऱ्या जोडव्यवसायाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे स्वप्न भंगले आहे.
आकाश देशमुख यांनी तीन महिन्यांपूर्वी शेवंती फुलांची लागवड केली होती. लागवडीसाठी तसेच तीन महिने देखभाल करण्यासाठी ८० ते ९० हजार खर्च केला आहे. मागील आठवड्यापासून फूल तोडणीला आले आहे. फूल तोडणी दोन वेळा झाली असून ७ ते १० हजार रुपये मिळाले आहेत.
बाजारात फुलांना कवडीमोल दर मिळत असून फूल बाजारात विक्री करून मिळालेला संपूर्ण पैसा मजूरदारांना द्यावा लागत आहे. जास्त पैसे देऊन सुद्धा मजूर मिळत नसल्याने नाईलाजाने शेतकऱ्याला फुलशेतीवर नांगर फिरवावा लागला. नांदेड जिल्ह्यात मागील दहा बारा दिवसांपासून वादळ व पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक पिकांना मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांना लुटतोय शेतकऱ्यांचाच लेक? व्यवस्थेच्या पुढे हतबल शेतीमातीतील व्यथा