सेलू : नोव्हेंबरपासून कापूस खरेदी-विक्रीला सुरुवात झाली आहे. यादरम्यान आज ना उद्या भाव वाढतील, अशी अशा शेतकऱ्यांना होती. मात्र, फेब्रुवारी संपला तरी अपेक्षित भाववाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात पांढऱ्या सोन्याची विक्री केली. (Cotton Market)
मात्र, मार्च महिन्याच्या मध्यापासून कापसाच्या भावात सातत्याने वाढ होत असून, सोमवारी खासगी बाजारपेठेत हंगामातील उच्चांकी ७ हजार ९३० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. (Cotton Market)
कापूस विक्री केल्यानंतर दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्यानंतर जून अखेरपर्यंत खरिपातील पेरण्या शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्यानंतर कापसाचे पीक (Cotton Crop) बहरात आले होते. (Cotton Market)
शेतकऱ्यांनीही चांगले उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खत, औषधी फवारणी करून मशागत केली होती. परंतु, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्वाधिक नुकसान कापूस आणि सोयाबीन पिकाचे झाले होते. (Cotton Market)
अनेक दिवस शेतात पाणी साचल्यामुळे कापूस पिवळा पडला होता. परिणामी दोन वेचणीतच कापसाचा झाडा झाला. सुरुवातीला खासगी बाजारात कापसाला अत्यल्प भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआयकडे ७,५२१ या हमीभावाने कापसाची विक्री केली. (Cotton Market)
सीसीआयने १५ मार्चपर्यंत ३ लाख ९१ हजार क्विंटल कापूस खरेदी करून केंद्र बंद केले. मात्र, मार्च महिन्याच्या मध्यापासून कापसाच्या दरात सतत वाढ होत आहे. शहरातील खासगी बाजारात कापसाची खरेदी सुरू आहे. सोमवारी हंगामातील उच्चांकी ७,९३० रुपये प्रति क्विंटल कापसाला दर मिळाला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच सीसीआय केंद्रावर कापसाची विक्री केली आहे.
मात्र, कापसाचे भाव वाढतील या आशेवर घरातच कापूस ठेवलेल्या शेतकऱ्यांचा भाव वाढीमुळे फायदा होताना दिसत आहे. दरम्यान, मार्च महिन्यात दररोज कापसाच्या दरात भाव वाढ होत असल्यामुळे खाजगी बाजारात कापसाची आवक वाढली आहे. उशिरा का होईना कापसाच्या भावामध्ये झालेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये किंचितसे समाधान व्यक्त होत आहे.
विक्रीनंतर भाववाढ
हंगामाच्या सुरुवातीला ७,२०० ते ७,३०० पासून कापसाचे दर होते. मार्च अखेरीपर्यंत कापसाच्या दरात चांगलीच तेजी आल्याचे दिसत आहे. सोमवारी ७,९३० रुपये दर मिळाला असून ८ हजारांच्या टप्प्याकडे कापसाची वाटचाल सुरू आहे. मात्र, कापूस विक्री केल्यानंतर भाववाढ होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
३३ हजार हेक्टरवर लागवड
सेलु तालुक्यात सिंचनाच्या सोयी अपुऱ्या असल्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकावर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक मदार अवलंबून आहे. गतवर्षी तालुक्यात सर्वाधिक ३३ हजार ३३० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे उत्पन्नावर परिणाम झाला.
५ लाख क्विंटल कापूस खरेदी
सीसीआय कडून ३ लाख २१ हजार क्विंटल कापूस खरेदी करून केंद्र बंद करण्यात आले आहे. तर खासगी बाजारात आजपर्यंत २० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे सेलूत आजपर्यंत जवळपास ५ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.