Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बाजारात साडेतीन वर्षाच्या प्रदीर्घ मंदीनंतर स्पर्धा वाढली; दर अजून वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 10:41 IST

soybean market जवळपास तीन ते साडेतीन वर्षाच्या प्रदीर्घ मंदीनंतर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

जवळपास तीन ते साडेतीन वर्षाच्या प्रदीर्घ मंदीनंतर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

राज्यातील अनेक बाजारपेठांमध्येसोयाबीनचे दर थेट ५,३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले असून, व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत हे दर ६,००० रुपये प्रतिक्विंटल रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तीन वर्षानंतर प्रथमच सोयाबीनने पाच हजारांचा टप्पा ओलांडल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. मात्र, या दरवाढीचा अपेक्षित फायदा अनेक शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही.

गेल्या काही वर्षातील सततच्या कमी दरांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीनची विक्री आधीच कमी भावात केली आहे.

त्यामुळे "आता भाव वाढत आहेत; पण, माल शिल्लक नाही," अशी खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तरीही सध्याची दरवाढ पुढील हंगामासाठी आशादायी असल्याचे मत शेतकरी बोलून दाखवत आहेत.

सध्या नाफेडकडून सोयाबीनचा हमीभाव ५३ रुपये २८ पैसे प्रति किलो जाहीर करण्यात आला असून, खासगी व्यापाऱ्यांकडून सुमारे ५३ रुपये ५० पैसे प्रति किलो दर दिला जात आहे.

मागील काही दिवसांत सोयाबीनच्या दरात जवळपास प्रति किलो ५ रुपयांची वाढ झाली असल्याचे बाजारातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.

गेल्या काही हंगामांच्या तुलनेत यंदा बाजारात सोयाबीनची आवक कमी असून, शिल्लक साठाही मर्यादित असल्याने दरवाढीस पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरवाढीमागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे नाफेडकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करून साठवणूक करण्यात आली आहे.

नारायणगाव बाजार समितीत सध्या सोयाबीन खरेदी सुरू◼️ दरम्यान, नाफेड अंतर्गत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बाजार समितीत सध्या सोयाबीन खरेदी सुरू असून, ५३ रुपये २८ पैसे प्रति किलो दराने व्यवहार होत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे यांनी दिली.◼️ एकूणच तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या भाववाढीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तेजी पाहायला मिळेल◼️ शेतकऱ्यांकडे असलेला उरलेला माल बाहेरील खासगी व्यापाऱ्यांना सहज उपलब्ध होत नाही.◼️ परिणामी, बाजारात स्पर्धा वाढून दर अधिक चढले असल्याचे जाणकारांचे मत आहे.◼️ जर ही परिस्थिती कायम राहिली, तर पुढील काही दिवसांत दरात आणखी तेजी पाहायला मिळू शकते.

सध्या बाजारात भाव वाढल्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे; पण, बऱ्याच शेतकऱ्यांकडे आता माल शिल्लक नाही. ज्यांच्याकडे थोडेफार सोयाबीन आहे, ते भाव आणखी वाढतील या अपेक्षेने घरीच ठेवत आहेत. नाफेडकडून खरेदी सुरू असल्याने बाजारात माल कमी पडतोय असे वाटते. - श्रीकृष्ण पानसरे, सोयाबीन उत्पादक

अधिक वाचा: सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना आता १० टक्के रक्कम भरून मिळणार सौर कृषीपंप; वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market Sees Competition After 3.5 Years; Prices May Rise

Web Summary : Maharashtra soybean farmers are relieved as prices reach ₹5,300/quintal, potentially hitting ₹6,000. After a long slump, rising demand and reduced supply boost prices. Farmers with remaining stock anticipate further gains amid increased market competition.
टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्डशेतकरीपुणेनारायणगाव