Join us

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काळी मिरची तिखट तर शिमला झाली फिकी; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:10 IST

Vegetable Market Rate : यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत काही जातीच्या मिरचीला अधिक भाव आहे. यात काळी मिरची गेल्या वर्षी ६० तर, यंदा ८० रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. तर शिमला स्वस्त झाली.

अनिल तांगडे

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा, धावडा, वाढोणा, विझोरा, मेहगाव, भोरखेडा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली आहे. आता ही उन्हाळी मिरची तोडणीला आली असून, शेतकरी घरच्या घरीच तोडणी करीत आहेत. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत काही जातीच्या मिरचीला अधिक भाव आहे.

यात काळी मिरची गेल्या वर्षी ६० तर, यंदा ८० रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. तर शिमला स्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. भोकरदन तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

त्यामुळे या मिरचीवर कोकडासह इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांना औषधी फवारणी करावी लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

एवढेच नव्हे, तर मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी मिरचीचा तोडा तोडून बाजारात विक्रीसाठी नेला आहे. सध्या बाजारात मिरचीची आवक कमी असल्यामुळे चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी दिसत आहेत. आगामी महिनाभरात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन निघून आवक वाढणार असल्याने भावातही मोठे घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

मागील वर्षीचे आणि यंदाचे प्रतिकिलोमध्ये भाव

मिरचीगतवर्षीयंदा
ज्वेलरी५० ४५ रुपये
शिमला६० ४५ रुपये
शिमला३० ३५ रुपये
काळी मिरची६० ८० रुपये

वन्यप्राण्यांकडून नासाडी

भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा, धावडा, वाढोणा, विझोरा, मेहगाव, भोरखेडा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे. परंतु, या मिरचीची हरिण, माकड, निलगाय आदी वन्यप्राण्यांकडून नासाडी केली जात आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मिरचीचे उत्पादन कमी निघाले असून, बाजारपेठेत आवक कमी आहे. परिणामी, भाव कमी अधिक आहेत. परंतु, आगामी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन अधिक झाल्यास आपोआप भाव कमी होतील. सध्या भाव तेजीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघून घरी पैसे राहत आहे. - अशोक तबडे, मिरचीचे ठोक व्यापारी, धावडा.

हेही वाचा :  उत्पादनाच्या तुलनेत राज्यातील प्रत्येकाच्या वाट्याला 'किती' येते दूध! वाचा काय सांगतो एनडीडीबीचा अहवाल

टॅग्स :बाजारमार्केट यार्डमार्केट यार्डमिरचीशेतकरीमराठवाडाशेती क्षेत्र