Join us

शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाची खरेदीदारांकडून थट्टाच; बाजार दरांपूढे धान उत्पादक शेतकरी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:22 IST

शेतकऱ्यांचे अख्खे कुटुंब मेहनत घेऊन शेतात धान पिकवितात. मात्र, विकायची वेळ आली, तेव्हा व्यापाऱ्यांकडून त्याची थट्टा केली जाते किंवा मिळेल त्या भावाने शेतकऱ्याला नाईलाजास्तव शेतमाल विकण्याची वेळ आलेली आहे.

दिलीप मेश्राम 

शेतकऱ्यांचे अख्खे कुटुंब मेहनत घेऊन शेतात धान पिकवितात. मात्र, विकायची वेळ आली, तेव्हा व्यापाऱ्यांकडून त्याची थट्टा केली जाते किंवा मिळेल त्या भावाने शेतकऱ्याला नाईलाजास्तव शेतमाल विकण्याची वेळ आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात सर्वत्र धानाचे मुख्य पीक घेतले जात असून श्रीराम, चन्नौर, कालका, परभणी, श्रीलेखा, मोहरा, सुंदरा अशा धानाच्या शेकडो वाणांची लागवड केली जाते.

यातील काही १०० ते १२० दिवसांचे तर काही १४५ ते १५५ दिवसांचे. अलीकडे बऱ्याच शेतकऱ्यांकडे बोअर, विहीर, शेततळे अशी पाण्याची साधने झाल्याने काही शेतकरी पावसाळी व उन्हाळी अशी धानाची दोन पिके घेतात. 

विशेषतः १०० ते १२० दिवसांचे धानाचे वाण म्हणजे हलके धान. उन्हाळी फसलमध्ये हलक्या धानाची लागवड करून शेतकऱ्यांनी कापणी व मळणी करून धानाची पोती घरी आणली. काही शेतकऱ्यांनी हार्वेस्टरने कापल्याने ते उन्हात वाळवून विक्रीसाठी योग्य केले. मात्र, योग्य भाव देणारा व्यापारी मिळेना.

वरिष्ठ स्तरावर खरेदी चालूच व्हायची असल्याचे सांगून व्यापाऱ्यांकडून पडलेल्या किमतीला धानाची मागणी सुरू आहे. शिवाय सामान्य शेतकऱ्याला याच धान विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून कापणी, बांधणी, मळणी व इतर खर्च भागवावा लागतो. त्यामुळे मिळेल त्या भावाने धान विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याने शेतकरी नडला जात आहे.

शासनाने दोन्ही धान खरेदी करावे

• शेतकऱ्यांसाठी शासनाकडून हमीभाव खरेदी केंद्रे दरवर्षी सुरू होतात; परंतु त्या केंद्रावरील भाव २३०० रुपये आहे. त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी केवळ ठोकळ पोत असलेले धान विकतात तर श्रीराम, एचएमटी सारखी बारीक पोत असलेले धान्य शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना विकतात. याचाच फायदा घेऊन व्यापारी शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेतात.

• त्यामुळे शेतकरी नडला जात आहे. शासनाने हमीभाव खरेदी केंद्रांवर ठोकळ व बारीक पोत असलेले दोन ग्रेड ठरवून व अलग-अलग भाव देऊन खरेदी केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांची प्रगती साधण्यास हातभार लागेल. शेतकऱ्यांची प्रगती साधताना दिसल्यास पुढची पिढीही नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळेल.

हेही वाचा : सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

टॅग्स :भातशेती क्षेत्रबाजारशेतकरीशेतीविदर्भ