Join us

फलटण बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण; कांदा उत्पादकांना बसतोय आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 10:04 IST

Phaltan Kanda Market : फलटण तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या दरात मोठ्या घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण येथे मंगळवारी, दि. २४ तारखेला कांद्याची मोठी आवक आल्याने दरात किमान ३०० ते २००१ रुपये प्रतिक्विंटल दर शेतकऱ्यांना मिळाला.

सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या दरात मोठ्या घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण येथे मंगळवारी, दि. २४ तारखेला कांद्याची मोठी आवक आल्याने दरात किमान ३०० ते २००१ रुपये प्रतिक्विंटल दर शेतकऱ्यांना मिळाला. बाजार समितीत एकूण २ हजार ९८१ क्विंटल आवक झाली. साधारणपणे ५ हजार ९६२ कांद्याच्या पिशव्यांची आवक झाली.

सध्या फलटण तालुक्यात विविध भागांत शेतकऱ्यांनी अडी लावून ठेवली होती; परंतु मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा पावसाने भिजला असल्याने बाजार समिती मोठी आवक झाल्याने दरामध्ये घसरण झाली आहे; परंतु उन्हाळी कांदा बाजारात येत असतानाच दरामध्ये मोठी घसरण सुरू झाली.

यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. आधीच लागवड आणि संगोपन खर्च वाढला असताना त्यात आता दर घसरत असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. उन्हाळी कांद्याची बाजारात आवक वाढल्याने दरात मोठा उतार आला आहे. दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत दर घसरला आहे.

फलटण तालुक्यात कांद्याचे क्षेत्र विस्तारत असून, अनेक शेतकरी हे वर्षभर कांदा पीक घेतात. तालुक्यातील कांदा केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, बाजार समितीत जातो. यंदाही उन्हाळी कांद्याचे क्षेत्र मोठे असून, त्यातच मागील ४५ दिवसांपासून साठवून केलेला उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागला आहे. आवक अधिक असल्याने दरात उतार आला आहे.

सध्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अडीच हजार ते तीन हजार प्रतिक्विंटल भाव मिळाला. साठवून ठेवलेला अडीमध्ये वीस टक्के कांदा खराब निघत आहे. उत्पन्नाचा खर्च ज्यादा असल्याने शासनाने हमीभाव द्यावा. - मोरेश्वर जाधव, शेतकरी, चौधरवाडी.

भाव मिळवून द्या...

पाच महिन्यांपूर्वी कांद्याला क्विंटलला साडेतीन हजारांपर्यंत भाव मिळत होता. मागील दोन महिन्यांपासून दोन हजार रुपये क्विंटलने कांदा विकला जात आहे. सध्या तर २ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

यंदा प्रचंड उन्हाळा व मुसळधार पावसामुळे कांद्याची क्वॉलिटी खूप खराब झालेले आहे. चांगल्या कांद्याचे आवक कमी आहे. तसेच शेतकऱ्यांकडे भरपूर कांदा साठा जास्त असल्याने भविष्यात कांद्याचे दर वाढतील, असे वाटत नाही. - धनेश शहा, व्यापारी, फलटण.

हेही वाचा : आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप 

टॅग्स :कांदाशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती