प्रफुल्ल लुंगे
केळीचे भाव नोव्हेंबरमध्ये एकदम ३०० ते ४५० रुपये प्रतिक्विंटलवर आले होते. केळी बागांची काटणी करायला व्यापारी तयार नव्हते. एकाच वेळी अनेकांच्या केळीच्या बागा काटणीवर आल्या होत्या. झाडावर केळीचे घड पिकून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
अखेर बागायतदारांनी आपल्या बागा छातीवर दगड ठेवून जेसीबी लावून उपटून फेकल्या. आता वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात केळीच नसल्याने नांदेडवरून व्यापारी केळी खरेदी करून आणत आहेत.
सध्या केळीचे भाव १ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तालुक्यातील केळी बागायतदारांनी केळीच्या बागा उपटून फेकल्याने त्यांना भाव वाढीचा काही फायदा झाला नाही. आता भाव एकदम वाढले. त्यामुळे कपाळावर हात मारून घेण्याची वेळ केळी बागायतदारांवर आली आहे.
सेलू तालुक्यात केळी बागायतदारांची संख्या दोन वर्षांपूर्वी खूप कमी झाली होती. पूर्ण तालुक्यात केवळ बोटावर मोजण्या इतक्या बागा होत्या. शासनाने एमआरजीएसमध्ये केळी बागांना अनुदान जाहीर केले आणि दुसरीकडे केळीला भावही चांगला मिळू लागला. त्यामुळे केळी बागायतदारांची संख्या झपाट्याने वाढली.
यंदा जेसीबीद्वारे केळी खोदून फेकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली असली तरी नव्या केळीच्या बागांची लागवड पुढील वर्षी भाव वाढेल या आशेवर मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे ढग निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.
सेंटर चालकांना फटका
सेलू शहरात कच्ची केळी आणून ते पिकवून व्यापाऱ्यांपर्यंत पोहचविणाऱ्या रायपनिंग सेंटर चालकांची संख्या पाच ते सहा आहे. केळी नसल्याने सर्वांना नांदेडवरून महागड्या दरात व वाहतूक खर्च करून कच्ची केळी आणावी लागते. त्यामुळे बाजारात पिकलेल्या केळीचे भावही आपोआपच वाढले आहेत.
तालुक्यामध्ये नवीन बागांची संख्या वाढली...
• महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर एकेकाळी उत्कृष्ट केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सेलू तालुक्याचे वैभव लोप पावत असताना गेल्या दोन-तीन वर्षांत पुन्हा बागायतदारांची संख्या झपाट्याने वाढली. आता तालुक्यात केळीच्या बागा दिसू लागल्या. भावसुद्धा चांगले मिळू लागले, मात्र एकाएकी नोव्हेंबरमध्ये भाव कोसळल्याने केळीची काटणी करायला व्यापारी तयार नव्हते.
• त्यामुळे केळीच्या बागा इतर पीक घेण्यास शेतकऱ्यांनी धन्यता मानली. आजघडीला केळीचे भाव १ हजार ५५० रुपये क्विंटल एवढे वाढले आहे. तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात केळी बागा शिल्लक नसल्याने व्यापाऱ्यांना नांदेडवरून कच्ची केळी खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील केळीचा बागा लावाव्या, जेणेकरुन उत्पन्न मिळेल.
असे वाढत गेले केळीचे दर
| महिना | दर (प्रति क्विंटल) |
| नोव्हेंबर २०२५ | ३०० ते ४५० |
| डिसेंबर २०२५ | ६५० |
| जानेवारी २०२६ | ७५० |
| फेब्रुवारी २०२६ | १ हजार ५५० |
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
Web Summary : Crashing prices forced farmers to destroy banana crops. Now, prices have soared, but farmers can't benefit. Increased demand from other districts highlights the impact of the earlier crop destruction, leaving farmers regretting their decision and hoping for better prices next year.
Web Summary : गिरती कीमतों के कारण किसानों को केले की फसल नष्ट करने के लिए मजबूर होना पड़ा। अब कीमतें बढ़ गई हैं, लेकिन किसानों को इसका फायदा नहीं मिल रहा है। अन्य जिलों से बढ़ी मांग पहले फसल विनाश के प्रभाव को उजागर करती है, जिससे किसानों को अपने फैसले पर पछतावा हो रहा है और अगले साल बेहतर कीमतों की उम्मीद है।