Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या बाजारात हरभऱ्याची आवक ३२ टक्क्यांनी घटली; वाचा दराची काय आहे स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 10:50 IST

Harbhara Market Update : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्यात हरभऱ्याच्या आवकेत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. उपलब्ध राज्यस्तरीय आकडेवारीनुसार, मागील आठवड्याच्या तुलनेत हरभऱ्याची आवक सुमारे ३२ टक्क्यांनी घटली आहे.

राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्यात हरभऱ्याच्या आवकेत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. उपलब्ध राज्यस्तरीय आकडेवारीनुसार, मागील आठवड्याच्या तुलनेत हरभऱ्याची आवक सुमारे ३२ टक्क्यांनी घटली आहे.

मात्र, मागणीतील शिथिलतेमुळे या घटेचा किमतींवर अपेक्षित सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. बाजारातील जाणकारांच्या मते, हरभऱ्याची आवक कमी होण्यामागे काही प्रमुख घटक कारणीभूत आहेत.

सध्या बाजारात खरेदीदारांकडून अपेक्षित मागणी नसल्याने शेतकरी माल बाजारात आणण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांकडे (डाळ गिरण्या) आधीच पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध असल्याने नव्या मालाची खरेदी मर्यादित आहे.

किमान आधारभूत दर ५,८७५ प्रति क्विंटल

रब्बी हंगामासाठी हरभऱ्याचा किमान आधारभूत दर ५,८७५ प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. मात्र, अनेक बाजारपेठांमध्ये प्रत्यक्ष व्यवहार या दरापेक्षा कमी दराने होत असल्याने शेतकरी विक्रीसाठी उत्सुक नसल्याचे चित्र आहे.

बाजारपेठेतील स्थिती

• अकोला बाजार समितीत आवक तुलनेने कमी असली, तरी प्रक्रिया उद्योग व स्थानिक व्यापाऱ्यांकडून मागणी कायम आहे. त्यामुळे येथे सरासरी दर ६,३०० च्या आसपास नोंदवले जात असून, बाजारात काही प्रमाणात स्पर्धा दिसून येत आहे.

• याउलट लातूरसह इतर काही बाजारपेठांमध्ये दरात किरकोळ घसरण झाली आहे. मर्यादित शासकीय खरेदी आणि मागणी-पुरवठ्यातील विसंगतीमुळे येथील दर हमीभावाच्या खालीच राहिले आहेत.

शेतकऱ्यांची कोंडी कायम

• राज्यात आवक मोठ्या प्रमाणात घटूनही दरात वाढ न झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी कायम आहे. काही बाजारपेठांमध्ये दर ५ हजारांच्या खाली घसरल्याचेही निदर्शनास येत आहे.

• शासकीय खरेदी केंद्रांची मर्यादित व्याप्ती आणि खुल्या बाजारातील कमी मागणी यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यात अडचणी येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण

English
हिंदी सारांश
Web Title : Chickpea Arrival Drops in Maharashtra Markets; Price Situation Explained

Web Summary : Maharashtra's chickpea arrival plummeted by 32%, but prices haven't risen due to weak demand and ample trader stocks. Farmers are hesitant to sell below the minimum support price of ₹5,875/quintal. Akola shows some price competition, while other markets face losses, squeezing farmers.
टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेतकरीपीक