चंद्रपूर : सध्या रब्बी हंगामातील गहू पीक जोमात असले तरी, बळीराजाच्या मनात मात्र चिंतेचे ढग दाटले आहेत. एकीकडे बाजारपेठेत गव्हाला अपेक्षित भाव मिळत नाही, तर दुसरीकडे पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत.
एका बॅगेला सरासरी ६ ते ७ क्विंटल उतारा येतो. एकरी खर्चाचा विचार केला तर मशागतीपासून मळणीपर्यंतचा आकडा २१ हजारांच्या पार जातो. गव्हाचे उत्पन्न जास्तीत जास्त ३० हजार रुपयांपर्यंत मिळते. साडेचार महिन्यांच्या काबाडकष्टानंतर शेतकऱ्याच्या हाती केवळ ७ ते ८ हजार रुपये उरतात. यात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा मोठा प्रश्न आहे.
एकरी गहू लागवडीचा खर्च
मशागत - २५०० रुपये, पेरणी - १२०० रुपये, खत - ४ हजार रुपये, बियाणे (३० किलो) २५०० रुपये, फवारणी - ४ हजार रुपये, कापणी - ४ रुपये, मळणी - ३ हजार रुपये असा एकूण खर्च २१ हजार २०० रुपये .
बियाण्यात भेसळ, शेतकऱ्यांची फसवणूक !
नामांकित कंपनीच्या 'केदार' वाणाच्या २० किलो बॅगमध्ये चक्क दुसऱ्या दर्जाचा भेसळयुक्त गहू दिसून आल्याचा धक्कादायक प्रकार पळसगाव शिवारात उघडकीस आला आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी करून भेसळ 3 असल्याचे मान्य केले आहे. आधीच महागड्या बियाण्यांनी शेतकरी त्रस्त असताना, अशा फसवणुकीमुळे उत्पादनावरही परिणाम होत आहे.
गव्हाच्या उत्पादनात वाढ
गतवर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने जिल्ह्यात गव्हाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यात यंदा सरासरी ७०,२९३ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आल्याने गव्हाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने मागील वर्षीच्या गव्हाच्या पेरणीची सरासरी मोडून यंदा मागील वर्षीच्या तुलनेत नऊ हजार हेक्टरने वाढ झाली आहे.
