प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. यापूर्वी २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी वितरित केला होता.
आधार लिंकिंग, अनिवार्य ई-केवायसी, जमीन नोंदणी पडताळणी, तसेच डुप्लिकेट लाभार्थ्यांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे २२ व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या कमी झाली.
योजनेच्या नियमांनुसार पती-पत्नी व १८ वर्षांखालील मुलांना मिळून एकच कुटुंब मानले जाते. कुटुंबातील फक्त एकालाच योजनेचा लाभ मिळतो. मात्र, या नियमाचे उल्लंघन झाल्याचे समोर आले.
अनेक ठिकाणी पती-पत्नी दोघांनीही स्वतंत्र नोंदणी केली होती, काही ठिकाणी मुलांच्या नावावर जमीन असल्याने त्यांनाही लाभ मिळत होता.
एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त नोंदी आढळल्यास त्या रद्द करून फक्त एकालाच लाभ देण्याची पद्धत लागू करण्यात आली.
लाभार्थी यादी कशी तपासावी?◼️ योजनेत आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे शेतकरीऑनलाइन पद्धतीने सहज तपासू शकतात.◼️ त्यासाठी सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे.◼️ त्यानंतर 'Beneficiary List' यावर क्लिक करा.◼️ पुढे राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गावाची माहिती निवडून 'Get Report' बटणावर क्लिक केल्यावर संबंधित गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसते.◼️ तसेच शेतकरी 'Beneficiary Status' पर्यायावर मोबाइल क्रमांक व नोंदणी क्रमांक टाकून हप्ता जमा झाला की नाही, याची माहिती तपासू शकतात.
हप्ता न मिळाल्यास काय कराल?◼️ योजनेचा हप्ता खात्यावर जमा झालेला नसल्यास शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन 'Beneficiary Status' पर्यायातून आपली माहिती तपासावी.◼️ हप्ता जमा झाला नसेल, तर आधार लिंकिंग, ई-केवायसी, बँक खात्याची माहिती व जमीन नोंदणीची माहिती अद्ययावत आहे का, हे तपासणे आवश्यक आहे.◼️ कोणतीही त्रुटी आढळल्यास जवळच्या सेवा केंद्रात किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून माहिती दुरुस्त करावी.
अॅग्रीस्टॅक' नसणाऱ्यांकडे लक्ष◼️ काही लाभार्थ्याकडे 'अॅग्रीस्टॅक' (डिजिटल शेतकरी नोंद) उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.◼️ त्यामुळे लाभार्थ्यांची स्वतंत्र पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.◼️ भविष्यात योजनांचा लाभ सुरळीत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली जमीन नोंद, आधार लिंकिंग, ई-केवायसी तसेच अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
आधार लिंक, ई-केवायसी केली का?◼️ अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण असल्याने किंवा आधार क्रमांक खात्याशी जोडलेला नसल्याने त्यांचा हप्ता थांबण्याची शक्यता असते.◼️ त्यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर किंवा जवळच्या सेवा केंद्रात जाऊन आधार लिंकिंग आणि ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे.
अधिक वाचा: गुढीपाडव्यापासून पुढील तीन दिवस वातावरणात बदल; राज्यात 'या' जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा