छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सोयगाव परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड (टरबूज) पिकाची लागवड केली आहे; मात्र सध्या या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर फलधारणेचा अभाव दिसून येत आहे. वेलीवर आलेली फुले सुकून गळून जात असल्यामुळे केलेला लागवड खर्च व मेहनत वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.
बदलते हवामान आणि नैसर्गिक परागीकरण करणाऱ्या मधमाश्यांची कमतरता हे यामागे प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे गहू, हरभरा, मका, आदी पिकांनी अपेक्षित उत्पादन दिले नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांचा वापर करत केळी, कलिंगड, खरबूज यांसारख्या पिकांकडे मोर्चा वळविला.
यामध्ये टरबूज पिकाचे प्रमाण सोयगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. या पिकासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत, रोप, लागवड तसेच खते व औषधींचा खर्च करून मोठ्या मेहनतीने टरबूज पीक फुलवले. जोपासना करीत असताना वातावरणातील बदलांमुळे फवारणीचा खर्चही वाढला.
मधमाश्यांचे घटते प्रमाण शेतीसाठी घातक
• सोयगाव परिसरात पूर्वी मधमाश्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. शेताच्या बांधावर जिकडे तिकडे मधमाश्यांचे पोळ लटकलेले दिसायचे. मात्र, गेल्या काही वर्षापासून हे प्रमाण लक्षणीय घटले आहे.
• परिणामी, नैसर्गिक परागीकरणाच्या प्रक्रियेत बाधा येत आहे. याचाच फटका टरबूज पिकासह अन्य पिकांनाही बसत असल्याचे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
नावीन्यपूर्ण प्रयोगात यंदा मोठा खर्च करून 66 नावीन्यपूर्ण कलिंगड पिकाची लागवड केली. दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला, मात्र वेलीवर फळधारणा होत नाही. फुले सुकून पडत आहेत. संभाव्य नुकसान लक्षात घेता शासनाने नुकसानभरपाईपोटी मदत द्यावी. - ईश्वर सपकाळ, शेतकरी, तिडका.
वातावरणातील बदल आणि नैसर्गिक परागीकरणासाठी मधमाश्यांचा अभाव ही प्रमुख कारणे सध्या दिसून येत आहेत. शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करताना केवळ शिफारस केलेल्या घटकांचाच वापर करावा. - रमेश गुंडीले, मंडळ कृषी अधिकारी, सोयगाव.
शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या
चांगल्या उत्पादनाच्या आशेने शेतकऱ्यांनी खर्चासोबत तडजोड केली नाही. सध्या टरबूज वेलीवर फुले लागत आहे. मात्र, फळधारणा होण्याअगोदरच ती फुले सुकून गळून जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
Web Summary : Soygaon farmers face watermelon crop failure due to declining bee populations hindering pollination. Changing climate and lack of natural pollination cause flower drop, threatening yields and increasing farmer distress. Experts advise careful pesticide use. Farmers seek government compensation.
Web Summary : सोयगाँव के किसान मधुमक्खियों की घटती आबादी से तरबूज की फसल की विफलता का सामना कर रहे हैं, जिससे परागण में बाधा आ रही है। बदलते जलवायु और प्राकृतिक परागण की कमी के कारण फूल गिर रहे हैं, जिससे उपज खतरे में है और किसानों की परेशानी बढ़ रही है। विशेषज्ञ सावधानीपूर्वक कीटनाशक उपयोग की सलाह देते हैं। किसान सरकार से मुआवजे की मांग करते हैं।