कुईवाडी : सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
एप्रिल महिन्यात खरड छाटणी केलेल्या बागांना मोठ्या प्रमाणात करपा व दावण्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फटका बसल्याचे समोर आले आहे.
यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी आता संबंधित प्लॉटची दुबार छाटणी केली असल्याने आर्थिक तोटाही त्याला सहन करावा लागला.
आता पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या बागांना पुन्हा एकदा फुटवा चांगला फुटल्याने फवारणीसाठी करावा लागणारा औषधांचा मोठा खर्च देखील सहन करावा लागणार आहे.
त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याची मागणी होऊ लागली आहे. माढा, बार्शी, पंढरपूर, करमाळा व उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांत सुमारे १५ हजार हेक्टरवर द्राक्षबागा आहेत.
द्राक्ष व बेदाण्याला योग्य भाव मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक संकटात सापडला होता.
साठ दिवसांनंतर केली पुन्हा छाटणीअवकाळी पावसामुळे काळी मातीच्या जमिनीतील बागेत फवारणीसाठी ट्रॅक्टर व्यवस्थित पोहचला नाही, त्यामुळे करपा व दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला अन् त्यामुळे बागा पूर्णतः खराब झाल्या. यामुळे अशा द्राक्ष बागायतदारांनी कृषिनिष्ठ परिवाराचे अध्यक्ष नितीन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ६० दिवसांनी पुन्हा एकदा द्राक्षबागेची छाटणी केली आहे. त्याला चांगला फुटवा फुटला असला तरी मजुरांचा, औषधांचा खर्च सहन करावा लागला. मात्र यंदा आपली बाग तरी फेल जाणार नाही, या आशेने मात्र शेतकरी द्राक्षबागेत जोमाने कष्ट करू लागल्याचे दिसून येत आहे.
छाटणी केल्यावर नवीन फुटी लवकर निघतील, परंतु, सूक्ष्म घडनिर्मितीकरिता आवश्यक असलेले वातावरण उपलब्ध नसल्याने अडचणी येतील. फक्त फुटी लवकर येणे म्हणजे सर्व काही नाही. त्याकरता संजीवके, खत व कॅनोपी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. कमी व मोकळ्या फुटी देखील महत्त्वाच्या आहेत. - डॉ. रामहरी सोमकुंवर, शास्त्रज्ञ, एनआरसी, पुणे
माढ्यात १०० हेक्टरच्या वर द्राक्षबागेत अवकाळीमुळे करपा व दावण्याचा फटका बसला आहे. डबल छाटणी केलेल्या शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र पावसाळा असल्याने अशा बागेत काडी विरळणी करताना कॅनोपी मॅनेजमेंटवर भर देत संजीवकांची मात्राही योग्य प्रमाणात घ्यावी. - नितीन कापसे, अध्यक्ष, कृषिनिष्ठ परिवार
अधिक वाचा: नर्सरीमधून फळांची रोपे खरेदी करताना त्यांची निवड कशी करावी? लागवड कशी करावी? वाचा सविस्तर