Join us

अजूनही वेळ गेली नाही; शेतकऱ्यांनो कष्टाच्या भाकरीला आजच द्या फायद्याच्या प्रगत चटणीची जोड

By रविंद्र जाधव (शिऊरकर) | Updated: June 5, 2025 20:45 IST

Farming : वाढतं शहरीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या जमिनींच्या विभागण्या, हवामान बदलाची तीव्रता आणि बाजारात वाढलेली स्पर्धा या सर्व गोष्टींना तोंड देण्यासाठी पारंपरिक शेतीला आता प्रगततेची जोड देणं अत्यावश्यक झालं आहे.

आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्र प्रगत होत असताना शेती क्षेत्र मात्र अनेक ठिकाणी अजूनही जुन्या रूढी आणि परंपरांवर टिकून आहे. पारंपरिक पद्धती, पिढ्यानपिढ्या चालत आलेली कामकाजाची साखळी आणि यातून निर्माण होणारी ‘कष्टाची भाकरी’ हे चित्र अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जीवनात किंबहुना मनामनात कायम आहे.

परंतु बदल ही काळाची गरज आहे आणि हा बदल आता केवळ गरज नसून एक अपरिहार्य वास्तव बनला आहे. वाढतं शहरीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या जमिनींच्या विभागण्या, हवामान बदलाची तीव्रता आणि बाजारात वाढलेली स्पर्धा या सर्व गोष्टींना तोंड देण्यासाठी पारंपरिक शेतीला आता प्रगततेची जोड देणं अत्यावश्यक झालं आहे.

आज डिजिटल शेतीचा जमाना आहे. पीक व्यवस्थापन, खत नियोजन, हवामानाचा अंदाज, कीड नियंत्रण यांसारख्या बाबींसाठी आता विविध अ‍ॅप्सद्वारे अचूक डेटा क्षणात उपलब्ध होतो. त्यातून पीक निवड करत कधी, कुठे, किती आणि कोणते पीक लावावं याचा निर्णय घेणे सोपे झाले आहे. तसेच या माहितीचा योग्य वापर करून आपलं उत्पन्न दुप्पटच नव्हे तर त्याहून अधिक करता येणं शक्य आहे. पण त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली पारंपरिक मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

एकीकडे वास्तव हे आहे की जमिनी कमी होत आहेत पण दुसरीकडे अन्नधान्याची मागणी प्रचंड वाढत आहे. आजची ही परिस्थिती संकटासारखी वाटली तरी तीच एक मोठी संधी ठरू शकते. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेणं, मागणीनुसार पीक निवड करणं, बाजारभावाचा अभ्यास करणं आणि साठवणूक व प्रक्रिया उद्योगात उतरून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणं ही सगळी दिशादर्शक तत्त्वं आजच्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात.

आजही अनेक शेतकरी शेतीतून फारसा नफा न मिळाल्यामुळे आपल्या मुलांना नोकरीसाठी शहरांकडे पाठवतात. पण खरा प्रश्न असा आहे की शेती नफा देत नाही की आपण तिच्यात पुरेसा अभ्यास आणि व्यावसायिक दृष्टिकोन आणलेला नाही? जर शेतीमध्ये अभ्यास, नियोजन आणि तंत्रज्ञान यांचा समावेश केला तर शेती नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न देणारी व्यवसाय संधी नक्कीच ठरू शकते यात दुमत नाही.

मात्र यात कष्टाला आधुनिक चटणी भाकरीची म्हणजेच विज्ञानाधिष्ठित दिशा आणि पारंपरिकतेला नवतेची साथ दिली गेली तर शेतीचं चित्र निश्चितपणे बदलू शकतं. कारण शेतकऱ्यांनी आता फक्त शेतमाल पिकवून थांबू नये तर त्याची किंमत स्वतः ठरवून विक्री व्यवस्थापनातही सक्रिय सहभाग घ्यावा घेणे गरजेचे आहे. 

हेही वाचा : शेतकऱ्यांना लुटतोय शेतकऱ्यांचाच लेक? व्यवस्थेच्या पुढे हतबल शेतीमातीतील व्यथा 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनबाजारग्रामीण विकास