समाधान इंदलकर
धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील वालवड परिसरातील पाटसांगवी, राळेसांगवी, हिवर्डा, वाल्हा, चुंबळी, सामनगाव आदी गावांतील शिवारात रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची काढणी सध्या जोरात सुरू झाली आहे.
यंदा पिकाची वाढ समाधानकारक असली तरी काढणीच्या टप्प्यावर मजुरांची कमतरता आणि वाढलेले मजुरीदर यामुळे शेतमालकांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. शेतशिवारात सध्या सकाळपासून सायंकाळपर्यंत काढणीची लगबग सुरू असली तरी खर्चाचा ताण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
ज्वारी काढणीसाठी महिला मजुरांना दिवसाकाठी तब्बल ५०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे. पुरुष मजुरांचे दर त्याहून अधिक असल्याचे शेतकरी सांगतात. एवढेच नव्हे तर अनेक शेतशिवार गावापासून दूर असल्याने मजुरांना शेतात आणणे-नेणे ही मोठी कसरत ठरत आहे. त्यासाठी वाहनभाडे म्हणून दररोज सुमारे १००० रुपये खर्च करावे लागत आहेत.
परिणामी, एकूण काढणी खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. ज्वारीचे उत्पादन हातात येण्याच्या टप्प्यावर असताना बियाणे, खत, औषधे, मशागत, पाणीपुरवठा या सर्व खर्चानंतर आता काढणीचा वाढलेला खर्च शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बाजारभाव अपेक्षित न मिळाल्यास उत्पादन खर्चही निघणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
मजुरांची कमतरता
ग्रामीण भागात मनुष्यबळाची टंचाई भासत असून, काही मजूर इतर भागात कामासाठी स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे उपलब्ध मजुरांची मागणी वाढली असून त्याचा परिणाम मजुरीदरांवर झाला आहे. सध्या शेतशिवारात 'मजूर मिळणे कठीण' अशी स्थिती आहे.
यांत्रिकीकरणाची गरज
पारंपरिक पद्धतीने काढणी करणे आता परवडणारे राहिलेले नाही. त्यामुळे ज्वारी काढणीसाठी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन द्यावे आणि त्यासाठी शासनाने विशेष अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
