जालना : कष्टाने पिकवलेल्या पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
जालना तालुक्यातील धारकल्याण येथील प्रयोगशील शेतकरी अमर विजय काकडे यांनी अशाच परिस्थितीत संतप्त होत तब्बल २६ क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.
अमर काकडे यांच्याकडे चार एकर शेती असून ते नेहमी नव्या पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी त्यांनी द्राक्षबाग लावली होती.
मात्र, हवामानातील अनिश्चितता आणि सततच्या नुकसानीमुळे त्यांनी द्राक्षबाग काढून टाकली. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी मोठ्या अपेक्षेने एक एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवड केली.
उत्पादन भरघोस, पण दर घसरले
टोमॅटोचे उत्पादन चांगले आले, मात्र बाजारात दर कोसळल्याने काकडे यांना मोठा फटका बसला.
टोमॅटो लागवडीसाठी एकरी सुमारे ५० हजार रुपये खर्च आला. त्यात तोडणी, पॅकिंग आणि वाहतूक खर्चही मोठा आहे.
एक कॅरेट बाजारात नेण्यासाठीच सुमारे १०० रुपये खर्च येतो, पण बाजारात एका कॅरेटला अवघे ३० रुपये दर मिळत असल्याने खर्चही निघत नसल्याचे त्यांनी सांगितले.
खर्च जास्त, उत्पन्न शून्य
काकडे यांनी १०८ कॅरेट टोमॅटो विक्रीसाठी बाजारात नेले. मात्र, आडत, हमाली, वाहतूक आणि तोडणीचा खर्च वजा जाता त्यांच्या हातात काहीच उरत नव्हते.
उलट वाहतूक खर्चही स्वतःच्या खिशातून भरावा लागत होता. या तोट्यामुळे हताश झालेल्या काकडे यांनी अखेर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याचा निर्णय घेतला.
प्रयोगशील शेतकरी आर्थिक कोंडीत
शेतीत नवनवीन प्रयोग करूनही बाजारपेठेतील अस्थिरता आणि दरातील चढ-उतारामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत असल्याचे या घटनेतून दिसून आले आहे.
उत्पादन वाढवूनही योग्य दर न मिळाल्यास शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.
मार्गदर्शन आणि बाजारपेठेची गरज
या घटनेतून एक बाब स्पष्ट होते की, केवळ उत्पादन वाढवणे पुरेसे नाही. शेतकऱ्यांना बाजारपेठेचे योग्य नियोजन, साठवण सुविधा आणि थेट विक्रीचे पर्याय उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.
प्रयोगशील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले, तर अशा प्रकारच्या घटना टाळता येऊ शकतात.
टोमॅटोला मिळालेल्या मातीमोल दरामुळे अमर काकडे यांच्यासारख्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
शेतमालाला हमीभाव, बाजारपेठेतील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांसाठी ठोस धोरणे राबविणे गरजेचे असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Harbhara Kharedi : हरभरा खरेदी अडकली; काय आहे कारण? वाचा सविस्तर
