Join us

मृगाचा 'कोल्हा' ठरला लबाड; आता आर्द्राचा 'उंदीर' पाऊस घेऊन येणार का? शेतकरी प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:18 IST

रोहिणी व मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दोन-तीन वेळा बऱ्यापैकी पाऊस पडला. याशिवाय हवामान खात्याने ११ जूनपासून चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु, पावसाचा एकही थेंब पडला नाही. त्यामुळे पेरलेले महागामोलाचे बियाणे वाळू लागले आहेत. परिणामी, शेतकरी चिंतातूर झाला आहे.

हबीब शेख

रोहिणी व मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दोन-तीन वेळा बऱ्यापैकी पाऊस पडला. याशिवाय हवामान खात्याने ११ जूनपासून चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु, पावसाचा एकही थेंब पडला नाही. त्यामुळे पेरलेले महागामोलाचे बियाणे वाळू लागले आहेत. परिणामी, शेतकरी चिंतातूर झाला आहे.

पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे शेतशिवारातील केलेली पेरणी वाया जाण्याची वेळ आली आहे. या भागांतील ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांनी कापसाच्या टोबणीसह हळद व सोयाबीनची लागवडसुद्धा केली आहे. परंतु, गेल्या ८ ते १० दिवसांपासून पावसाचा थेंबही नसल्याने अंकुरलेले कोंब वाचवण्यासाठी शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

तसेच हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील पाळणा, सिद्धेश्वर जवळाबाजार आदी भागांत तर मृग नक्षत्राच्या 'कोल्ह्याने' शेतकऱ्यांच्या हातावरच तुरी दिल्या आहेत. अख्खे मृग नक्षत्र कोरडे गेले.

हवामान खात्याच्या अंदाजावर येथील ४० ते ५० टक्के शेतकऱ्यांनी कापसाची टोबणी केली. पण जो दिवस निघतो तो कोरडा जात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

दरम्यान रविवारपासून 'आर्द्रा' नक्षत्राला सुरुवात झाली आहे. आर्द्राचा 'उंदीर' उड्या मारत आनंदसरी बरसवून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलवणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंतचे पावसाचे अंदाज चुकीचेच ठरले

• औंढा नागनाथ तालुक्यासह जिल्ह्यात ११ जूनपासून समाधानकारक पाऊस पडेल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. परंतु, तो फोल ठरला आहे. याशिवाय यंदाचे हवामान विभागाचे सर्व अंदाज पूर्णपणे खोटे ठरले आहेत.

• आकाशात ढगांची गर्दी व्हायला लागली की, शेतकऱ्यांच्या नजरा आपोआपच आकाशाकडे जातात. मात्र, काही वेळातच निराशा पदरी पडते. येत्या दोन दिवसात तालुक्यात सार्वत्रिक पाऊस पडल्यास पिकांना जीवदान मिळू शकते. खोळंबलेल्या पेरण्या पूर्णत्वास जातील.

• अन्यथा दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची दाट शक्यता आहे.

आर्द्राच्या 'उंदरावर' मदार

• ८ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. पण परिसरात मृगाच्या 'कोल्ह्याने' धावती भेटसुद्धा दिली नाही. अख्खे नक्षत्र कोरडेच गेले. २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होत आहे.

• आता शेतकऱ्यांची दारोमदार आर्द्राच्या 'उंदरावर' अवलंबून आहे. उंदराने आनंदसरी बरसवाव्यात व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलवावे, असे साकडे शेतकरी वरूणराजाकडे घालत आहेत

ढगांची गर्दी जमते; पण पाऊसच नाही

• पाऊस न पडलेल्या शेतशिवारातील कोंब अवस्थेत असलेली पिके उन्हामुळे कोमेजू लागली आहेत. आकाशात काळ्याकुट्ट ढगांची रोजच गर्दी होते. काही भागांत अंगणातील सडा टाकण्यासारखा पाऊस पडतो आहे.

• मात्र, पुरेसा सार्वत्रिक पाऊस पडत नाही. सकाळी-सायंकाळी पिके टवटवीत दिसतात. मात्र, दुपारच्या कडक उन्हात पिके कोमेजून जातात.

हेही वाचा : संततधार ते मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये जलसाठा उफाळला; वाचा कोणत्या धरणात किती जलसाठा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीहिंगोलीशेतीहवामान अंदाजपाऊसपीकखरीप