जयेश निरपळ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ लाख ७ हजार ५१८.९१ हेक्टरवरील पिकांचे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
परंतु त्यांच्या या आश्वासनाचा बार फुसका निघाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप दमडीही जमा झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त ६ लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीला अंधारच आहे.
सप्टेंबरमध्ये सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कपाशी, सोयाबीन, मका, उडीद, मूग यांसह मोसंबी, केळी, पपई, डाळिंब आदी फळबागांचेही अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
सर्व तालुक्यांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने राज्य शासनास शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी प्रस्तावही पाठविले. मात्र, प्रत्यक्षात मदत न मिळाल्याने या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे.
नुकसान झालेले शेतकरी व शेती
तालुका | शेतकरी | बाधित क्षेत्र (हे.) |
पैठण | ९६.६३३ | ९२,३८९ |
वैजापूर | १,२४,१८७ | १,०७,७८०, |
गंगापूर | ७८,५४० | ७५,०९८ |
कन्नड | ९८,०७० | ८१,२९३ |
सिल्लोड | ८२,२३५ | ८१,०२४ |
फुलंब्री | ६०,७३७ | ४१,२७५ |
खुलताबाद | २४,८५१ | २९,८९९ |
सोयगाव | ३२,६३० | ३५,७५२ |
संभाजीनगर अप्पर | ७,०८१ | ६,३८३ |
संभाजीनगर ग्रामीण | ८०,८२४ | ५६,६२१ |
एकूण | ६,५८,७८८ | ६,०७,५१८ |
७ वेळा अतिवृष्टी
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यात २२, २३, २५, २६, २७, २८ आणि २९ सप्टेंबर या दिवसांचा समावेश आहे. या अतिवृष्टीमुळे बहुतांश नद्या, नाल्यांना पूर आला होता. अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या होत्या.
५६२ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर; पण...
• नुकसानीचे पंचनामे करून जिल्ह्यातील ६ लाख ७ हजार ५१८.९१ हेक्टरवर झालेल्या नुकसानीपोटी ६ लाख ८५ हजार ७८८ शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने ५६१ कोटी ७९ लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनास सादर केला आहे.
• मात्र, नरक चतुर्दशीच्या दिवशी सोमवारी शासनाने ९१ कोटींच्या निधीचा जीआर काढला. यानंतर लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबिजेची सलग सुटी असल्याने पुढील कोणतीही प्रक्रिया तूर्त होऊ शकणार नाही, हे विशेष.
शेतकऱ्यांचे नुकसान, नेत्यांचे कृषी पर्यटन
• शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत धीर देण्याचा आव सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आणला.
• चिखलात, ट्रॅक्टर, बैलगाडीत बसून नेत्यांनी नुकसानीची पाहणी केली. मात्र, दिवाळी सणाचा दिवस उजाडला तरीही खात्यात रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून सत्ताधारी नेत्यांसह विरोधी नेत्यांबाबतही संताप व्यक्त केला जात आहे.
मदतीच्या मुदतीत फक्त 'जीआर'
• दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊन त्यांची दिवाळी आनंदात साजरी करू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते; परंतु अद्याप एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.
• विशेष म्हणजे मदतीचे आश्वासन दिलेल्या मुदतीत दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला केवळ काही निधीचा शासन निर्णय (जीआर) काढण्याचा सोपस्कार शासनाने केला आहे
विरोधकांकडून टीकेची झोड
• सरकारच्या विलंबामुळे बळिराजाची दिवाळी अंधारात साजरी होत असल्याचे दुर्दैव असल्याचे काँग्रेसचे सूर्यकांत गरड म्हणाले. दिवाळीला सरकारकडून शेतकऱ्यांच्या पदरात आश्वासनांशिवाय काहीच पडलेले नसल्याची टीका उद्धवसेनेचे दिनेश मुथा यांनी केली.
• तर शेतकरी अडचणीत असताना सरकार जाती-धर्मात भांडण लावण्यात मश्गुल आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सूर्यकांत थोरात यांनी केला.
Web Summary : Farmers in Sambhajinagar district face a bleak Diwali as promised compensation for crop damage due to excessive rainfall hasn't materialized. Despite government assurances and submitted proposals, funds are yet to reach the affected farmers' accounts, triggering widespread discontent.
Web Summary : सांभाजीनगर जिले के किसान भारी बारिश से फसल क्षति के लिए मुआवजे के वादे के पूरा न होने से दिवाली अंधेरे में मना रहे हैं। सरकारी आश्वासनों और प्रस्तावों के बावजूद, प्रभावित किसानों के खातों तक धन नहीं पहुंचा है, जिससे व्यापक असंतोष है।