Join us

कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी; चाळीतील कांदा सडू लागल्याने शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:48 IST

Onion Storage : अवकाळी पावसाने भिजल्यानंतर चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा महिनाभरातच सडू लागल्याने उन्हाळी कांदा उत्पादकांचे धाबे दणाणले आहे.

नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाने भिजल्यानंतर चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा महिनाभरातच सडू लागल्याने उन्हाळी कांदा उत्पादकांचे धाबे दणाणले आहे.

लागवडीपासूनच बेमोसमी पावसाच्या विळख्यात सापडलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शासनाने तातडीने हमीभाव योजना सुरू करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

उन्हाळी कांदा लागवडीचे बियाणे (काळे ऊळे) पेरा करण्यापासूनच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक केली. अनेक शेतकऱ्यांना तब्बल तीन वेळा या बियाणांचा पेरा करणे भाग पडले.

नोव्हेंबर, डिसेंबरला होणारी कांदा लागवड फेब्रुवारी, मार्चपर्यंत लांबत गेली. लागवडीसाठी मजुरीपोटी शेतकऱ्यांना एकरी दुप्पट, तिप्पट दाम मोजावे लागले. रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशकांची महागडी फवारणी, निंदणी व आंतरमशागतीचा खर्चही आवाक्याबाहेर करावा लागला होता.

दरम्यान, मे महिन्यात जास्त प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसला. अशात पावसात भिजलेल्या कांदा टिकून रहावा यासाठी शेतकऱ्यांनी तो चाळीमध्ये ठेवला. मात्र, चाळीत साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हमीभावाने खरेदी करा

शासनाने उत्पादन खर्चावर आधारित सरासरी अडीच ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दराने शेतकऱ्यांचा कांदा तत्काळ खरेदी करावा. नाफेडतर्फे कांदा खरेदीस प्राधान्य द्यावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

आजच्या परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी उत्पादन खर्चही निघणार नाही म्हणून मेटाकुटीस आला आहे. मोठ्या प्रयत्नांनी साठविलेला कांदा चाळीत सडू लागत्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता कांद्याला हमीभाव योजना त्वरित लागू करावी. - केशव मांडवडे, कांदा उत्पादक, बागलाण.

प्रमाण ५० ते ६० टक्के

• कांद्याची निवड करून कांदा चाळीत भरण्याची मजुरी गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट द्यावी लागली.

• मात्र, आता साठवलेला कांदा जुलै, ऑगस्टनंतरच लिलावासाठी आणण्याच्या मानसिकतेत असलेल्या कांदा उत्पादकांना आजच कांदा सडू लागल्याने जीव टांगणीला लागला आहे.

• गोलटी सडण्याचे प्रमाण ५० ते ६० टक्के असल्याने मध्यम व मोठा कांदाही या महिनाअखेर बाधित होईल या भीतीने कांदा उत्पादकांना ग्रासले आहे.

हेही वाचा : ताडकळस येथील २२ वर्षीय पदवीधर तरुणाने भाजीपाला उत्पादनातून मिळविले नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न

टॅग्स :कांदाशेतकरीशेतीशेती क्षेत्रबाजारनाशिक