Join us

Sugarcane Harvesting : ऊसतोड खंडणीचा पाडू कंडका; खडसावून सांगा खुशाली देणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:43 IST

Sugarcane Harvesting : खंडणीच्या कॅन्सरवर औषध काय, अशी एकच चर्चा गेल्या चार दिवसापासून शिवारापासून गावातल्या कट्ट्यापर्यंत सुरू आहे, परंतु या आजारावरील औषध देण्यासाठी वैद्य परग्रहावरून येणार नसून उपचार करण्याची क्षमता येथील बळीराजाच्या मनगटात नक्कीच आहे.

शरद यादवकोल्हापू: खंडणीच्या कॅन्सरवर औषध काय, अशी एकच चर्चा गेल्या चार दिवसापासून शिवारापासून गावातल्या कट्ट्यापर्यंत सुरू आहे, परंतु या आजारावरील औषध देण्यासाठी वैद्य परग्रहावरून येणार नसून उपचार करण्याची क्षमता येथील बळीराजाच्या मनगटात नक्कीच आहे.

या प्रश्नवार एकच करा, कोणात्याही स्थितीत खंडणी देणार नाही व मागितली तर हातात बुडका घेऊन जाब विचारण्याची हिंमत ठेवा. कायदा तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे केवळ लढण्याची तयारी ठेवा.

याबाबत 'लोकमत' शेतकन्यांशी पाठीशी खंबीरपणे उभे राहील, शेतकऱ्यांचा जागल्या म्हणून काम करेल. तुम्ही फक्त आवाज द्या, सगळे एकत्र येऊन खंडणीचा कंडका पाडायचा निर्धार करा. कोल्हापूर ही परिवर्तनाची भूमी आहे, हेच आपण विसरत चाललो असल्याने आज ही स्थिती ओढवली आहे. 

कसा पण जाऊदे पण माजे रान मोकळे होऊदे या अट्टहासाने खंडणीचा काळ सोकावून बसला आहे या सर्व अनागोंदीत १० ते २० गुंठे शेत असणारा शेतकरी पुरता भरडला असल्याचे फोन 'लोकमत'ला गेल्या चार दिवसांपासून आले.

शेतकऱ्यांच्या मनात लुटणाऱ्यांबाबत प्रचंड चीड असल्याचे दिसले; परंतु याचे रूपांतर वणव्यात झाले तरच हा भस्मासुर जळून खाक होईल, एवढेच ध्यानात ठेवा.

प्रादेशिक साखर संचालकांनी याबाबत कायदा केला आहे. त्यानुसार पैसे मागितले तर तक्रार करा, गावात सुकाणू समिती स्थापन करा, कुणीही खुशाली द्यायची नाही, अशी शपथ घ्या.

जिल्ह्यात साधारणतः ४५० संचालक आहेत. त्यांना याबाबत पुढाकार घेण्यासाठी उद्युक्त करा, तरच शेती अन् शेतकरी टिकेल, अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा जास्त दोषी असतो, हेही लक्षात असूधा.

'ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा...' ही ओवी साडेपाचशे वर्षांपूर्वी संत चोखामेळा यांनी लिहून ठेवली आहे. त्यानुसार परिवर्तनाची शक्ती नक्कीच आपल्यात आहे. त्या ताकदीचा शोध घेऊन कामाला लागा.

आशावाद कायम ठेवा...अजूनही मला पहाटेची स्वप्ने पडतात, एवड्याशा अंधाराने मी निराश होणार नाही, अजूनही मला वसंताची चाहूल लागते. एवढ्याशा पानगळीने हताश होणार नाही. रखरखते उन्हाळे अधूनमधून येतच असतात, ढग बरसणार नाही असेही नाही. आजूबाजूचे गवत थोडं वाळलं आहे: पण अंगणातील तुळस अजून जिवंत आहे... या कवितेच्या ओळी आजच्या स्थितीत शेतकऱ्यांच्या उमेद वाढविणाऱ्या आहेत.

'लोकमत'ची भूमिका..जिल्ह्यात कुठेही शेतकऱ्याला एक रुपयाही खंडणी देण्याची वेळ येऊ नये, हाच 'लोकमत'चा उद्देश आहे. काही अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी जरूर आमच्याशी संपर्क करावा. हा प्रश्न तडीस जाईपर्यंत 'लोकमत' थांबणार नाही. तसेच मंत्री हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर यांनीही प्रश्नावर प्रशासनाबरोबर बैठक घेऊन तोडगा काढावा. शेतकरी नागवला जात असताना प्रशासन शांत कसे काय बसू शकते. शेतकरी संघटना, सामाजिक संस्था, प्रगतशील शेतकरी यांनीही यावर विचार करून एकत्र यावे.

लोकमतने गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेली मालिका शेतकऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे, याबद्दल 'लोकमत' चे अभिनंदन. आम्हीही गेल्या २० वर्षापासून चळवळीत काम करत आहे. गेले दोन वर्षे मी प्रादेशिक साखर संचालक कार्यालयाने स्थापन केलेल्या कारखान्यांच्या वजन काटे तपासणी भरारी पथकात होतो, या काळात जिल्ह्यात एकही कारखान्याच्या काट्यात फरक आढळला नाही, हे आठवे आश्चर्यच मानावे लागेल, शेतकरी, तोडकरी, ट्रॅक्टरवाले यांचा वजनाबाबतचा अंदाज चुकत आहे. याचाच अर्थ काटामारी सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आता काट्यानेच काटा काढावा, तसेच कुणीही खुशाली देऊन नये. - वैभव कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष

वृत्तमालिकाने काळ्या बाजाराचा भांडाफोड केल्याबद्दल लोकमत'चे अभिनंदन, शेतकऱ्याऱ्यांनी कारखान्याकडे उसाची नोंद केल्याने तो ऊस तोडून नेणे कारखान्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे तोडणीसाठी खुशाली देण्याची काही गरज नाही. शेतकऱ्यांनीसुद्धा कड काढला पाहिजे. वाहतूकदारांनी कारखान्यांकडून आणि मजुरांनी वाहतूकदारांकडून उचललेला अॅडव्हान्स ते लोक कर्ज काढून फेडणार आहेत काय? त्यामुळे शेतकऱ्यांनी तोडणीबाबत गडबड केली नाही तर चित्र नक्की बदलेल. - भरत शिंदे, शेतकरी पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा

गेली चार दिवस 'लोकमत'ने लुटीचा पर्दाफाश करून जागृती केली आहे. या प्रश्नाला आणखी एक कारण आहे ते म्हणजे गावातील गटातटाचे राजकारण. आपल्या बगलबच्चांचे ऊस लवकर नेले जातात. त्यामुळे सामान्य शेतकरी हतबल होतो. कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्याअभावी खंडणी द्यावी लागते. याला कारखाना प्रशासन जबाबदार आहे. त्यांनी झोपेचे सोग घेतले आहे. - उत्तम गावडे, माजी सरपंच, शिगाय, ता. वाळवा, जि. सागली

लहरी निसर्गामुळे उसाचे उत्पादन घटले आहे. त्यातच तोडीसाठी खंडणी द्याची लागत असल्याने शेती सोडून घावी, असेच वाटत आहे. या प्रश्नाकडे शासनाने लक्ष देऊन मार्ग काढावा, पर्यायी चांगले पीक मिळाले तर आम्ही ऊस लावणेच बंद करणार आहे. - संभाजीराव चौगुले, शेतकरी, कुडित्रे, ता. करवीर

अधिक वाचा: पन्नास वर्षे झाली तरी साखर कारखाने अजून कर्जातच! असं कसं शक्य आहे; काय हाय विषय? वाचा सविस्तर

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीकोल्हापूरशेतीपीकसरकारहसन मुश्रीफप्रकाश आबिटकर