वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ गळीत हंगामात गळितास आलेल्या उसास पहिला हप्ता ३२०० रुपये प्रतिमेट्रिक टन देण्यात येणार आहे.
तसेच उर्वरित एफआरपीची रक्कम येणाऱ्या दिवाळीपूर्वी अदा करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष व माजी आमदार मोहनराव कदम यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे संचालक, महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोहनराव कदम म्हणाले, यंदाच्या गाळप हंगामात सोनहिरा साखर कारखान्याने १४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी लागणारी सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणेची उभारणी केली आहे.
आपल्या कारखान्याने नेहमीच चांगला दर देण्याची परंपरा जोपासली आहे. साखर कारखान्याने आजअखेर ३ लाख २८ हजार २२५ मे. टन उसाचे गाळप केले आहे. तसेच कारखान्याचे उपपदार्थ प्रकल्प को-जनरेशन व डिस्टीलरी पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.
ऊस शेतकऱ्यांनी सोनहिरा साखर कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कारखान्याने आत्तापर्यंत उत्तम प्रगती केली आहे. याही पुढे प्रगतीचा आलेख चढता असणार आहे.
कारखाना परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी आपले कारखान्यास पाठवावा. यावेळी कारखान्याचे कार्यकारी शरद कदम उपस्थित होते.
अधिक वाचा: एक आड एक सरीत उसाचे पाचट ठेवले तर काय होतील फायदे; वाचा सविस्तर