Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ऊस गाळपाची मोठी घाई; कारखान्यांनी पहिल्या उचलीचा आकडा जाहीर केल्यावरच उसाला कोयता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 09:35 IST

एकाही कारखानदाराची भूमिका ऊस दर जाहीर करण्याची नाही, असे समजते. २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये जिल्ह्यातील एकूण १९ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतले. हीच परिस्थिती यंदाही राहील अशी शक्यता आहे.

कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील १७ कारखान्यांचा गळीत हंगामही सोमवार, २७ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे.

मात्र, एकाही कारखानदाराची भूमिका ऊस दर जाहीर करण्याची नाही, असे समजते. २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये जिल्ह्यातील एकूण १९ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतले. हीच परिस्थिती यंदाही राहील अशी शक्यता आहे.

२० ऑक्टोबरपासून कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. ते कारखाने कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील सीमावर्ती भागातील ऊस उचलतात.

त्यामुळे उसाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारने दि. १ नोव्हेंबरपासून कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. पण, सीमाभागातील कारखान्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा दिली आहे.

३७५१ रुपये द्या, मगच गाळप सुरू करा◼️ गेल्या वर्षभरात साखरेची विक्री सरासरी ३८०० रुपये क्विंटलने झालेली आहे. इथेनॉल, बायोगॅस (जैववायू), मळी, अल्कोहोल यांसह इतर उपपदार्थानाही चांगला भाव मिळाला आहे.◼️ यामुळे गत हंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये दुसरा हप्ता व चालू गळीत हंगामातील पहिली उचल विनाकपात ३,७५१ रुपये मिळाले पाहिजेत.◼️ पहिली उचल जाहीर करूनच कारखानदारांनी उसाची तोड सुरू करून गळीत हंगाम चालू करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

सीमा भागातील सात कारखाने गळीत हंगाम सुरू◼️ जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह शेजारील कर्नाटक हद्दीतील सात कारखान्यांकडून जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणावर उचलत आहेत.◼️ गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळेही उसाची वाढ खुंटली आहे. यामुळे यंदा एकरी सरासरी उत्पादन घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.◼️ गतवर्षी एक एकरात ६० टन ऊस निघाला आहे, त्याच क्षेत्रात सध्या ४० टनही उतारा मिळत नसल्याचे चित्र आहे, असे कृषी क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे.

कर्नाटकातील कारखाने दि. २० ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखान्यांचे गळीत हंगाम वेळेत सुरू केले नाहीत, तर कर्नाटकातील कारखाने आपला ऊस घेऊन जातील. जिल्ह्यातील कारखान्यांना उसाची टंचाई निर्माण होईल. - आर. डी. माहुली, कार्यकारी संचालक, राजारामबापू साखर कारखाना

अधिक वाचा: इंजिनिअरचे १४ लाखांचे पॅकेज सोडून धनराज पाटलांनी सुरु केले पशुपालन; मिळविले १ तोळे सोन्याचे बक्षीस

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीसरकारराज्य सरकारसांगलीकर्नाटक